थेट तहसीलदार म्हणून सेवेत रुजू झालेले शिंदे माझे आवडते तहसीलदार होते. कारण त्यांच्यात मी दहा वर्षापूर्वीच्या 'मला' पाहात होतो. माझ्यासारखाच त्यांचा संवेदनाक्षम स्वभाव, भ्रष्टाचाराचा तिटकारा व सामाजिक बांधिलकीचं असलेलं भान ..... माझंच ते प्रतिरूप होतं व ते जपणं मी माझं कर्तव्य समजत होतो.
(उदक : हमी ? कसली हमी? पृ. ९३)
हेच आदर्श तहसीलदाराचे संदर्भ त्यांच्या 'फ्रॉम गुड टू ग्रेटनेस' या प्रशासनावरच्या ग्रंथाचे प्रसिद्धीपूर्व अवलोकन करताना आढळले होते.
या कथांत आत्मनिष्ठ अभिव्यक्ती मोठ्या प्रमाणावर आहे. आधुनिकतावाद्यांना ती आक्षेपार्ह वाटण्याची शक्यता आहे. पुष्पा भावे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलेल्या वाङ्मयबाह्य घटकांचे प्राबल्यही बरेच आहे. रूपबंधाचे स्तोम माजवणाऱ्यांना हा एक धक्काच आहे. कथेचे केंद्र, कलात्मकता, लय, आशय आणि घाटाची एकरूपता अशा गतशतकात वाल, दभि इ. समस्त कुलकर्यांच्या सौंदर्यवादाला झुगारणाऱ्या या रचना आहेत. परंतु देशमुख त्याच संस्कृतीचे एक घटक असल्यामुळे 'खडकात पाणी' वर अंधश्रद्धा संवर्धनाचा आक्षेप येऊ शकेल. इथे 'पाणी' हे आशयसूत्र आधीच ठरल्यामुळे घाट जो सापडेल तो जुळवून वापरला जातो. लेखकाची दलितांबद्दलची सहानुभूती सर्वात जास्त कथात व्यक्त झाली आहे. तिचं अत्युच्च टोक 'उदक' मध्ये गाठलं आहे. गावातील दलित वस्तीवर बहिष्कार टाकणारे सवर्ण कायद्याचा बडगा दाखवूनही त्यांना मुळीच सहकार्य करीत नाहीत. वेळेवर पाण्याचा टँकर न आल्यामुळे बाळ व बाळंतीण दगावतात. अॅट्रासिटीत पाटलांना अडकवल्याची ही परिणती असते. आज याच कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ब्राह्मणांनी आरक्षण व अॅट्रॉसिटीच्या मागण्यासाठी मोर्चा काढला होता एवढे हे वास्तव दाहक आहे. त्याच ग्रामजीवनातील पाण्याशी संबंधित निवडक बाबी 'उदक' मध्ये कथारूपात प्रभावीपणे मांडल्या आहेत. या तिन्ही कथासंग्रहातील रूपबंध, भाषाशैली वगैरे वैशिष्ट्यांवर शेवटी भाष्य करू.
"नंबर वन' मधील कथा शिकार कथा, भूत कथा या सारख्या विशिष्ट क्षेत्राशी संबंधित परिभाषेतील कथा आहेत. विशिष्ट संज्ञा व संकल्पनांचा अभ्यास असावा लागतो. 'फिरूनी नवी जन्मेन मी' भटक्या पाथरवट समाजातील मीना धावण्याच्या शर्यतीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या जिद्दीने दोहाला जाते. सानियाच्या व्हीलनगिरीमुळे तिला लिंगनिदान चाचणीला सामोरे जावे लागते. ती स्पर्धेतून बाद