पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/5

हे पान प्रमाणित केलेले आहे.


प्रस्तावना


 माझे आजपर्यंत पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेले जवळजवळ सर्वच लिखाण हे शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने तयार झालेले आहे. शेतकऱ्यांमध्ये शेतकरी संघटनेचा विचार व शेतीचे अर्थशास्त्र आणि स्वातंत्र्याचे महत्त्व मांडण्याकरिता प्रामुख्याने ते लिखाण झालेले आहे. या मधल्या काळात एक काळ असा येऊन गेला की ज्या वेळी एका प्रसिद्ध दैनिकाने माझ्या लेखांची मागणी केली आणि ते लेख शेतीविषयी नसावेत, अशीही त्यांनी एक सूचना केली होती. दैनिक राज्यकर्त्या पक्षाचे असल्यामुळे माझी शेतीविषयीची मते छापण्याची त्यांची फारशी इच्छा नसावी हे उघड आहे.
 मीही, पाहावेतरी एकदा प्रयोग करून असे मनात म्हणून. लेख लिहिण्याचे मान्य केले. या लेखसंग्रहात छापले गेलेले लेख हे प्रामुख्याने या काळात लिहिलेले आणि त्यामुळे, साहजिकच, शेती हा विषय सोडून इतर विषयांवर लिहिलेले आहेत.
 'सर्व शासनव्यवस्थेची सुरुवातच मुळी शेतीमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनाची लूट करण्याची आहे' हा शेतकरी संघटनेचा सिद्धांत आहे. इंग्रजी अंमलाच्या काळात इंग्रजांनी प्रथम हिंदुस्थानात कायदा आणि सुव्यवस्था स्थापन केली. याउलट, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशी राज्यकर्त्यांनी समाजवादाच्या नावाखाली लायसन्स्-परमिट-कोटा राज्य तयार केल्यामुळे काळाबाजारवाले, तस्कर आणि गुंड यांचे राज्य सगळीकडे माजले. आणि, आज जी पुंडगिरी दिसत आहे ती त्या समाजवादी कालखंडाचाच परिणाम होय. एका अर्थी राजनीती माहेराला म्हणजे तिच्या मूळ स्थानाकडे गेली आणि पुन्हा एकदा, आज जे आपण पहातो ते, भ्रष्टाचार, भूखंड लाटणे आणि लाचलुचपत हे मूळ स्वरूप राजनीतीने धारण केले आहे.

पाच