त्यांच्या राजीनाम्याने किंवा तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा नाकारल्याने तसा काही धोका नव्हता, पण तरीही घरातल्या घरात रुसवेफुगवे काही बरे नाहीत. मागच्या वेळी जयललिताजी कोपागारात गेल्या; त्यांच्याकडे पंतप्रधानानी लक्ष दिले नाही आणि सारे सरकारच कोसळले. त्यामुळे, या वेळी लक्ष देणे भाग पडले. अलीकडे रुसवेफुगवे इतके की पंतप्रधानांना जातीने अनुनय करणे शक्य नाही. मग, असा अनुनय दूतांकरवी केला जातो. पंतप्रधानांनी दूताहाती संदेश धाडला, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. लोकांना भाववाढीचा फार त्रास होणार आहे. पण भाव वाढविण्यापलीकडे काही दुसरा मार्गच नाही. तरीपण आम्ही एकूण भाववाढीच्या तिसरा हिस्साच ग्राहकांवर लोटत आहोत, दोन-तृतीयांश बोजा सरकारी तिजोरीवरच पडणार आहे. ममताताई खूश! बंगालमध्ये डाव्या आघाडीवरील मात इतकी हातातोंडाशी आली असताना राज्यकर्त्या आघाडीची कास सोडण्याइतक्या त्या अव्यवहारी नाहीत. भाववाढीला विरोध करण्यासाठी राजीनामा टाकला की, गरीबांचे कैवारी असल्याचा मोठा बोलबाला होतो, त्यासाठी ही सारी धावपळ. पंतप्रधान अविवाहित आहेत, कुटुंबकलह सोडवण्यात त्यांचा अनुभव शून्य. पण तरीही, श्रीकृष्णालाही लाजवील अशा कौशल्याने त्यांचा कोपागार अनुनयाचा कार्यक्रम चालू आहे.
मंत्रीमंडळाचा शपथविधी झाल्यापासून दररोज कोणी ना कोणी कोपागारात जाऊन बसते. कधी सुषमा स्वराज, कधी जॉर्ज फर्नांडीस, कधी राम जेठमलानी तर कधी आणखी कुणी! पंतप्रधानांची चतुरता अशी की, कोपागरात जाऊन दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांच्या लगेच लक्षात येतो. आणि मग, अनुनय दूरच राहिला, महालातून हकालपट्टी होऊ शकते. राम जेठमलांनीच्या बाबतीत असेच झाले, सत्यनारायण सिंहही असेच फसले.
ज्यांचा अनुनय इष्ट अशी मंडळी कोपागरात जाऊन बसली की अशांत सदनात अटलबिहारींचा हरी येतो आणि युक्तिप्रयुक्तिने रुसवा काढतो. असे हे कोपागाराचे राजकारण आहे.
महाउष्णश्वासे करुनि वदते शुष्क अधरा.
धरापृष्ठी जोडा न शठ दुसरा या गिरिधरा..
धराया माझा हा कर कपटि कैंचा जलमला.
मला जो निंदूनी कुसुम तिस देऊनि रमला..