पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/140

हे पान प्रमाणित केलेले आहे.






शेतीपुढील जागतिक दर्जाचे आव्हान


 भारतीय शेती एका प्रचंड उलथापालथीच्या उंबरठ्यावर उभी आहे.
 इंग्रज येण्यापूर्वी देशातील शेती इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत मागास नव्हती, भारतीय शेतकऱ्यांचे कौशल्य आणि ज्ञान पाहता परदेशी तज्ज्ञदेखील चकित होत होते, गावकरी खाऊनपिऊन सुखी होते अशी वर्णने ऐकवली जातात. फारच स्वदेशाभिमानी वक्ता असेल तर देशात दह्यादुधाच्या नद्या वाहत होत्या, देशात समृद्धीची रेलचेल होती, कशाला काही ददात नव्हती अशी वर्णने ऐकवतो.
 या वर्णनांत तथ्य किती आणि भाषेचा फुलोरा किती हे शोधणे काही कठीण नाही. फार पुरातन काळापासून देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशांत पडलेल्या दुष्काळांची विश्वसनीय वर्णने ऐकायला मिळतात. सर्वसाधारणपणे, दर दहा वर्षांतून एकदा तरी मोठा दुष्काळ देशात पडत असावा. महाराष्ट्रात शिवाजीच्या काळी दुर्गादेवीचा दुष्काळ झाला. सतत बारा वर्षे पावसाने दगा दिला. परिणामी झालेल्या दुष्काळात संत तुकाराम महाराजांची 'बाईलही उपासाने मेली', असे पुराव्याने दिसते.
 मनुस्मृतीतही, शेतकऱ्यांना घरी तांब्याचा पैसादेखील बाळगण्याची मनाई केलेली आढळते; कोणा कुणब्याने पैसा साठवला तर त्याला कठोर शिक्षा सांगितलेली आहे. म्हणजे, अन्नधान्याचा व्यापार फारसा प्रचलित नसावा. शेतकऱ्याच्या जीवनात सुखाची पराकाष्ठा म्हणजे चांगले पीक येऊन वर्षभर पोटभर खातापिता आले म्हणजे 'गंगेत घोडे न्हाले'!

 इंग्रजपूर्व काळातील खेडेगावातील अन्नसौकर्य आणि अन्नसौलभ्य या गोष्टी फारतर उच्चवर्णीय आणि अतिउच्चवर्णीय यांच्यापुरत्याच लागू असाव्या. गावातील गोरगरिब आणि मागास जातीय यांनाही सुखाने पोटभर खाता येईल अशी परिस्थिती इंग्रज येण्यापूर्वी काही शतकेतरी या देशात नांदत असावी, असे मानण्यास

अन्वयार्थ – दोन / १४२