पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/189

हे पान प्रमाणित केलेले आहे.



दहावा अवतार- तंत्रज्ञान


 २००० सालच्या मे महिन्यात क्रिकेटचे सामने विकण्याखरीदण्याची भानगड प्रकाशात आली; वर्षभर ती गाजली. लहानपणापासून ज्यांना चरित्रनायक चरित्रनायक म्हणून पोरेटोरेसुद्धा मानायची, ते सारे क्रिकेटपटू एकामागोमाग एक भ्रष्ट ठरले. क्रिकेटच्या क्षेत्रातून त्यांची हकालपट्टी झाली. आणि, हे शक्य झाले कारण दिल्लीतील काही ध्येयवादी तरुणांच्या लहानशा गटाने भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्याचे ठरविले; एखाद्या फिल्मी हिरोप्रमाणे 'ढिश्याँव ढिश्याँव' करून नाही, पिस्तूल घेऊन नाही तर हातात एक छुपा कॅमेरा घेऊन. या कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्यांनी संबंधित व्यक्तींच्या बोलण्याचे चित्रण केले आणि एवढे 'चक्षुर्वैसत्यम्' झाल्यानंतर मग भ्रष्टाचाराचे भांडे फुटणे अटळच होते.
 त्यानंतर फक्त दहाच महिन्यांत या वादळी गटाने आणखी एक हल्ला चढविला. क्रिकेट खेळाडूंच्या प्रकरणी त्यांची कामगिरी मोठी; पण त्यांनी तो भ्रष्टाचार उजेडात आणल्यानंतर लोकांना धक्का बसला तो आपली एवढी मोठी फसवणूक झाली याचा. क्रिकेटचे सामने म्हणजे हिंदुस्थानातील लोकांचे एक वेड. ज्या खेळाने आपण बेहोश होऊन जातो ते सारे खोटे, बनावट होते याचा तो धक्का होता.

 १३ मार्च २००१ रोजी या वादळी टोळीने हल्ला केला तो भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण, समता पक्षाच्या अध्यक्षा जया जेटली, संरक्षण मंत्रालयातील बडे अधिकारी आणि प्रत्यक्ष लष्करातील काही मोठे अधिकारी यांच्यावर. लष्करी सामुग्रीच्या खरेदीप्रकरणी या मंडळींनी लाच घेण्याचे मान्य केले. लाच देणारी एक लुटुपुटीची कंपनी तयार करण्यात आली. प्रत्यक्ष लाच स्वीकारण्याचे फीतचित्रण करण्यात आले आणि त्याच्या प्रदर्शनाने दिल्लीत वादळ म्हणजे वादळच उठले.
 आपल्या देशात पवित्र मानावीत अशी आता फारशी स्थाने राहिलेली नाहीत.

अन्वयार्थ – दोन / १९१