पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/279

हे पान प्रमाणित केलेले आहे.

परकायाप्रवेशाचा विचार मनुष्य सहज करतो. माणूस केवळ स्वार्थी नाही, त्याच्यात एक दुसऱ्याची जाणीव ठेवण्याची नैतिकता असते. या नैतिकतेचा उगम या परकायाप्रवेश प्रवृत्तीत आहे असे ॲडम स्मिथने मांडले (Theory of Modern Sentiments) तहलकाच्या वेगवेगळ्या प्रलोभनांना सामान्यजनांची प्रतिक्रिया वेगवेगळी होते याचे कारण हा परकायाप्रवेश आहे. आपण त्या जागी असतो तर काय केले असते या प्रश्नाचे जो तो उत्तर शोधतो आणि आपल्या मनातील 'बंगारू लक्ष्मण' ला विचारून आपली भूमिका ठरवतो.
 सर्वसामान्य मनुष्य लष्करी सामग्रीची कंत्राटे देत नाही. असल्या प्रकरणी भ्रष्टाचार झाला तर देशाची सुरक्षा आणि जवानांचा जीव धोक्यात येतो या जाणिवेने तो बंगारू लक्ष्मण इत्यादींच्या विरुद्ध संतापाने उठतो. बंगारू लक्ष्मणांच्या जागी आपण असतो तर लाखाचे बंडल आपण नक्कीच नाकारले असते अशी मनात खात्री पटली, की तो बंगारूसाहेबांच्या विरुद्ध बोलतो; पत्रकारांच्या विरुद्ध नाही. याउलट, आशीक लष्करी अधिकाऱ्यांच्या जागी आपण असलो, पंचतारांकित हॉटेलच्या आपल्या खोलीत कोणी माषुक पाठवले गेले तर त्या मोहाला बळी पडण्याचे आपण टाळू शकू किंवा नाही याची ग्वाही तो स्वत:च्या मनालाच देऊ शकत नाही. साहजिकच, या विषयावरील त्याची भूमिका उलट्या टोकाची होते.
 नोटांची सूटकेस आणि माषुक यांच्यात प्रलोभने म्हणून फरक अंशात्मक आहे; लोकांच्या प्रतिक्रियेत जे 'घूम जाव' होते ते लोकांच्या मनातील सदसद्विवेकबुद्धी अजून थोडीतरी जिवंत आहे या कारणाने.

दि. १/९/२००१
■ ■

अन्वयार्थ - दोन / २८१