पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/286

हे पान प्रमाणित केलेले आहे.

घोषणा करून टाकली होती, "माझी ही पंतप्रधानकीची शेवटची पाळी आहे." त्याही वेळी त्यांच्या त्या निवेदनाने आनंद वाटला होता. तीन वर्षाच्या अवधीत वाजपेयीजींना आपण राजकीय स्थैर्याला अवास्तव महत्त्व दिले असा कबुलीजवाब देण्याची वेळ आली. हे का घडले याचा काही तपशील वाजपेयीजींनी मनमोकळेपणाने जाहीर केला तर युतीच्या राजकारणाच्या सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात त्यांच्या राजकीय वारसदारांना त्याचा मोठा फायदा होईल.
 सत्तेचे आपले असे एक व्याकरण असते. सत्तेच्या पदावर कोणी, फारशी कोरी पाटी घेऊन पोहोचू शकूच नये अशी साऱ्या सामाजिक-राजकीय-आर्थिक व्यवस्थेत काही रचना असते. सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नांतच तडजोडी करीत करीतच हातपाय बांधलेल्या एका तडफदार नेत्याचे गाठोडे सत्तास्थानी येऊन पडते. त्यानंतर, सत्तासंपादनाच्या प्रयत्नांत अंगावर चढलेली पुटे आणि बंधने झटकून काढून टाकण्याचे धाडस क्वचितच कोणाला होते. उलट, पावलोपावली, 'खुर्ची टिकली तर पुढची सारी बात' अशी मनाची समजूत करीत करीत भलेभले अधःपाताच्या मार्गाला लागतात.
 अटल बिहारी वाजपेयी, त्यांच्या कारकिर्दीची शेवटची दोन वर्षे राहिली असताना खडबडून जागे झाले आणि आपली विचारधारा स्पष्ट करण्याइतकी आणि मोहीम उघडणाऱ्या संघपरिवारातील बड्या प्रस्थांनाही तंबी देण्याची हिंमत त्यांनी दाखविली हे देशाच्या दृष्टीने मोठे शुभचिन्ह आहे.

दि. १५/९/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / २८८