पान:अस्पृश्य -विचार.pdf/41

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३८ )

कोणालाहि सहज करता येण्यासारखा आहे. पण पुष्कळदां हा हिशेब चुकेल. खजिन्याची बिनबोभाट ने-आण करून राजपुरुषांच्या विश्वासास पात्र झालेला, गांवकीच्या दरबारांत पाटील-कुळकर्ण्याच्या खालोखाल मान सांगणारा आणि क्वचित् रणमैदानाचीहि हवा पाहिलेला महार सहजच आपल्याला चांभारापेक्षा श्रेष्ठ समजतो. पण सर्वच चांभार हे त्याचे श्रेष्ठत्व कबूल करणार नाहीत. स्वच्छतेच्या दृष्टीने दोऱ्या वळणारा मांग इतरांहून श्रेष्ठ असावा, पण तो " भाजी " खाणारा असल्यामुळे कमी समजला जातो. महाराच्या देवळाच्या आवारांत सुद्धा मांग येऊ शकत नाही. आणि चमत्कारिक वाटेल पण परटापेक्षा आपल्याला श्रेष्ठ मानणारे महार कोठे कोठे भेटतील ! शहरांत दारूचे व्यसन या लोकांना अतिशय असते. आणि महार दारुड्याची दारू न पिण्याबद्दल केलेली आर्जवें फार वाया जातात अशी व्होलंटिअर्सची तक्रार आहे. शहरांत पानस्वातंत्र्य फार; तसेंच सिनेमांतील उघडींनागडी चित्रे पाहावयाचा नादहि मोठा आणि श्रीमंतांनी आणि खावंदांनी खेळावयाच्या रेसेच्या हैदोसाची चटकहि मोठी. या गोष्टींनी शहरांतील अस्पृश्यांच्या मनाची धुळधाण उडवून दिली असते. कांहीं कांहीं खेडेगांवचे मांग व रामोशी चोऱ्यादरवड्याबद्दल मुलुखभर कीर्ति कमवून राहिले आहेत ! अशी जरी हकीकत असली तरी शुद्धीवर राहिलेले अस्पृश्य काही थोडे नाहीत. आपली स्थिति, आपली आपत्ति पाहून खेद आणि दुःख यांनी भरून गेलेले अस्पृश्य आपल्याला पुष्कळ भेटतील. शहरांत जागेची फार जिगजीग असल्यामुळे स्वच्छतेचे मान पाहिजे असून सुद्धां पुरेसे ठेवता येत नाही. खेडेगांवची हीच प्रजा पाहिली म्हणजे आनंद होतो. घरें स्वच्छ, माणसें चालीरीतीची आणि क्वचित् भारदस्तहि दृष्टीस पडतील. त्यांना पाहून अस्पृश्यतानिवारणाची जरूरी का आहे हे मनांत अधिक ठसते, आणि समाजाने मनांत आणले