पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/50

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क्रांतिकारी मंगल पांडे

 कोणत्याही राष्ट्राच्या विकासात त्याच्या स्वतंत्र होण्याची कहाणी नेहमी अपूर्णतःच लिहिली जाते. विसावे शतक जगाच्या इतिहासात स्वातंत्र्याचा संदेश घेऊन आले. या शतकात जितके देश दास्यतेच्या शृंखलेतून मुक्त झाले तितके किंबहुना एखाद्याच शतकात झाले असतील. विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रांचा उदय याच शतकात झाला. लोकतंत्रात्मक राज्यसत्तेचा पाया याच शतकात पक्का झाला. महात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेलांसारख्या अनेक स्वतंत्रता सेनानींनी विशाल जनसभा, मोर्चे, घेराव, प्रदर्शनासारख्या सत्याग्रहांद्वारे अन्यायी राज्यसत्तेविरुद्ध जनसमुदाय उभा केला. ‘‘जनता आयी है, सिंहासन खाली करो" यासारखे नारे याच शतकात बुलंद झाले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणत्याही देशाला स्वातंत्र्य हे शांतीपूर्ण मार्गाने कधीच मिळालेले नाही. स्वातंत्र्यासाठी भूमिगत आंदोलन, बंड, क्रांती, बॉम्ब विस्फोट, हत्याकांडाचे उपाय अवलंबिले गेलेच. भारताच्या स्वातंत्र्यासाठी विचार केला तर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, हिंसात्मक आणि अहिंसात्मक हे दोन्ही मार्ग समांतर आणि समानपणे हाताळले गेले. दोन्हींचा परिणाम कमी-अधिक रूपाने झाला आणि देश स्वतंत्र झाला. या अगोदर आपल्या देशबांधवांना शंभर वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीपर्यंत इंग्रजी सत्तेविरुद्ध अखंडपणे संघर्ष करावा लागला. आपल्या स्वातंत्र्य आंदोलनाची सुरुवात सन १८५७ पासून मानली जाते. हे तेच वर्ष आहे, जेव्हा इंग्रजी सत्तेविरुद्ध एका साहसी शिपायाने बंडाचा पहिला झेंडा फडकावला होता. त्याचे बंड म्हणजे काय होते? वर्षानुवर्षे दबलेल्या ज्वालामुखीचा स्फोट होता तो! त्याने इंग्रजी सत्तेला फक्त ललकारलेच नाही, तर आपल्या असीम धाडसाने घाबरवून सोडले. त्या स्वातंत्र्य सेनानीचे नाव आहे क्रांतिकारी मंगल पांडे. स्वातंत्र्य संग्रामाचा पहिला बळी आणि होय, देशाचा पहिला हुतात्मा।

आकाश संवाद/४९