पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/80

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संत कबीरांचा आचार धर्म

 हिंदीतील सुविख्यात संत कवी कबीरदास यांनी सुमारे सहा शतके उलटली तरी त्यांनी व्यक्त केलेले विचार आजही तितकेच प्रासंगिक आणि प्रेरक वाटतात. संत म्हटला की देव, धर्म या गोष्टी आपसूक येतात, पण संत कबीरांनी आपल्या काव्याद्वारे तत्कालीन रूढीग्रस्त समाजात प्रागतिक बनवले. पुरोगामी संतकवी म्हणून कबीरांचे आगळे महत्त्व आहे.
 कबीरांनी आपल्या काव्यातून जो आचारधर्म व्यक्त केला त्यात परंपरा आणि रूढीस स्थान नाही. दगडाच्या देवास पुजण्यापेक्षा ते जात्याची पूजा करणे पसंत करतात. कारण जाते धान्याचे पीठ करून देते. जातीपातीच्या समाजातील भिंती त्यांना अमान्य होत्या. श्रेष्ठ-कनिष्ठपणा त्यांना मान्य नव्हता. जो ईश्वराची भक्ती करतो तो ईश्वरप्रिय होतो असे ते सांगत. मंदिर, मशीद असे धर्मभेदही त्यांना मान्य नव्हते. पंडित, मौलवींनी धर्माच्या नावावर पाडलेल्या रीतिरिवाजांवर त्यांनी कडाडून हल्ला केला. माळ जपण्यापेक्षा मन जपण्याची शिकवण कबीरांनी दिली ती आजही तितकीच सार्ध वाटते.
 ‘कथनी तजि करनी करै, विषसे अमृत होय' म्हणणारे कबीर ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे' या समर्थांच्या शिकवणीची आठवण करून देतात. साधुता ही दाढी, मिश्या वाढवून आणि भगवी वस्त्रे नेसून सिद्ध होत नसते. ते साधुता हे आंतरिक शुद्धतेचे प्रतिबिंब मानत. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ या षड्रिपूंपासून मानवाने स्वतःच मुक्त ठेवले पाहिजे. विकारमुक्त जीवनच सार्थक ठरते, अशी त्यांची धारणा होती. कनक आणि कामिनीच्या मोहापासून माणसाने चार हात दूरच राहायला हवे, हे त्यांनी आग्रहाने स्पष्ट केले

आहे. स्त्रीच्या सावलीने भुजंग तो आंधळा होतो तिथे माणसाचे काय? असा प्रश्न करणारे कबीर आचरण शुद्धतेचेच समर्थन करतात.

आकाश संवाद/७९