पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१६९

हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५९ )
दुसरे नारायणराव व्यंकटेश.

झाल्यामुळें त्यास जिकडे तिकडे स्थिरस्थावर करण्याची आवश्यकता व उत्कंठा होती. परंतु ती उत्तम संधि बाबासाहेबानीं गमावल्यामुळें इचलकरंजी संस्थानाचा दर्जा निष्कारण कमी झाला ! कारण कीं, इचलकरंजीकर हे फक्त सातारा राजमंडळाचे सरदार आहेत असा जो पेशवाईच्या वहिवाटीवरून साहेबलोकांचा ग्रह झाला होता. त्यांत एकदोन वर्षे लोटलीं नाहींत तोंच फेरबदल झाला व इचलकरंजी संस्थानावर करवीरकरमहाराजांचा कांहीं अंशीं तरी ताबा आहे असें मानणें वाजवी आहे असें त्यांस वाटूं लागलें !
 सन १८१२ त शिवजीमहाराज मरण पावल्यावर त्यांच्या गादी वर त्यांचे ज्येष्ठपुत्र संभाजीमहाराज बसले होते हें मागें सांगितलेच आहे. या महाराजांस आबासाहेब असें म्हणत असत.सन १८२१ च्या जुलई महिन्याच्या दुसऱ्या तारखेस सयाजी मोहिते नांवाच्या शिलेदाराची व आबासाहेबांची कांहीं बोलाचाली होऊन तींत यां मोहित्यानें आबासाहेबांस ठार मारिलें. नंतर त्यांचे धाकटे बंधु शाहूमहाराज गादीवर बसले यांस बुवासाहेब असे म्हणत असत. सातारचे थोरले शाहूमहाराज यांसही बुवासाहेब असें नांव होतें, व तेच नांव या करवीरच्या शाहूमहाराजानींही धारण केले होतें. या बुवासाहेबांची कारकीर्द फारच दंग्याधोप्याची झाली. तिचें वर्णन पुढें येईलच.
 प्रांत पन्हाळा व मिरज येथील देशमुखीचें वतन शाहूमहाराजानीं इचलकरंजीकरांस दिलेले होतें. देशमुखी वतनाबद्दल वतनदारास सरकारची चाकरी करावी लागते व नजर द्यावी लागते. परंतु इचलकरंजीकर हे शाहूमहाराजांच्या कृपेतले व पेशवेसरकारचे आप्तसंबंधी असल्यामुळें त्यांस या वतनासंबंधेंं कधीं कोणाची चाकरी करावी लागली नाहीं अगर कोणास नजरही द्यावी लागली नाहीं. मिरज प्रांताच्या देशमुखीबद्दल शाहूमहाराजानीं व त्यांमागें त्यांच्या पेशव्यानीं