पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/138

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राथमिक शिक्षक? नव्हे, शासकीय वेठबिगार!


 प्राथमिक शिक्षक अजूनही खेड्यापाड्यांत, वाडी-वस्तीत आदरास पात्र आहे. त्याचे कारण आपल्या देशात आदर जपला आहे शिक्षकांनीच. थोर भारतीय कथाकार प्रेमचंद. ते शिक्षणाधिकारी होते. प्राथमिक शिक्षकांचं जीवन त्यांनी जवळून अनुभवले होते. त्या आधारावर त्यांनी एक गोष्ट लिहिली आहे. 'बोध' तिचे नाव. तीन मित्रांची ही गोष्ट. तीन मित्र भिन्न व्यावसायिक. पंडित चंद्रधर शिक्षक. त्यांचे दोन शेजारी मित्र. एक ठाकूर अतिबल सिंह. ते हेड कॉन्स्टेबल होते. दुसरे मुन्शी बैजनाथ. ते होते मामलेदार कचेरीत अकौंटंट. तिघे मिळून अयोध्येला जायला निघतात. प्रवासात एक चोर पोलिसास ढकलून देतो; कारण त्याने चोराला अनावश्यक त्रास दिलेला असतो. दुसरा बैजनाथ. त्याला प्रवासात कॉलरा होतो. चोखेलाल डॉक्टरकडे त्याला घेऊन जातात. तो त्याला नाडवतो; कारण कचेरीत बैजनाथने त्याला खूप येरझाच्या घालायला लावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर तिघे अयोध्येस पोहोचतात. तेव्हा पंडित चंद्रधरांचा विद्यार्थी कृपाशंकर भेटतो. तो गुरूविषयी आदर, कृतज्ञता म्हणून गुरूंचे गौरवपूर्ण आतिथ्य करतो. इतर व्यावसायिकांपेक्षा शिक्षकाचा व्यवसाय समाजास आदरपात्र कसा, हे सदरची कथा समजावते.

 असा प्राथमिक शिक्षक. त्याची शासनाने काय दैना केली आहे म्हणून सांगू? विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांतील म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांची. ते आज एकच मागणी करून राहिलेत... ‘आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या'; पण शासनाने हे बहुधा बघायचे ठरवूनच टाकले आहे की, ‘बघूया कसे शिकवता ते?' या शिक्षकांना शासन बहुधा

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१३७