शैक्षणिक निर्णयानुसार शालेय शिक्षण मंडळाच्या पदवीस/परीक्षेस (इ.१२वी) ४० टक्के तर प्रवेश परीक्षा (जेईई) ला ६० टक्के वेटेज देण्यात आल्याने येथून पुढच्या काळात कोचिंग क्लासेसचे प्रस्थ व महत्त्व कमी होईल.
या संदर्भातील एक वास्तव सर्वांनी समजून घेतले पाहिजे की, विद्यार्थी, पालक मूलतः शिकवणी वर्गाना का जातात? शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थी व शिक्षक प्रमाण व्यस्त असल्याने व्यक्तिगत लक्ष अभावाने दिले जाते. शिक्षकाचे काम नेमून दिलेल्या अभ्यासक्रम पूर्ण करणे असे झाल्याने काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक शाळा, महाविद्यालयात शिक्षक पाट्या टाकायचे काम करतात. विद्यार्थ्यांना कळावे, समजावे म्हणून अधिक वेळ शिकविणे, गतिमंद विद्याथ्र्यांवर लक्ष केंद्रित करणे हे वेळापत्रकांच्या फ्रेममध्ये शक्य होत नाही. कोचिंग क्लासेसवाले शिकविण्यापेक्षा करून घेण्यावर (टेस्ट, सोल्यूशन, इ.)वर भर देतात. पूरक सामग्री (नोट्स, प्रश्नपत्रिका संच इत्यादी) पुरवतात. परिणामी विद्यार्थी पालकांना तिथेच खरे शिक्षण होते असे वाटते. यामुळे व याचा फायदा घेऊन पालकांची मूक संमती असल्याने विद्यार्थी, शाळा कॉलेजीसपेक्षा कोचिंग क्लासेसना महत्त्व देताना दिसतात. अलीकडे इयत्ता दहावी, इयत्ता बारावी व महाविद्यालयीन वर्षे या सर्व स्तरांवर विद्यार्थी उपस्थिती प्रमाण हे ‘झेंडा टू झेंडा' काळातच (१५ ऑगस्ट ते २६ जानेवारी) सरासरी असते. महाविद्यालयीन स्तरावर सेमिस्टर पद्धत अवलंबल्याने अध्यापन काळावर परीक्षाकाळाचे आक्रमण झाले आहे. शाळांमध्येही घटक चाचण्या, तिमाही, सहामाही, नऊमाही, पूर्वपरीक्षा व वार्षिक परीक्षा असा कालखंड मोजू लागलो तर तिथेही प्रत्यक्ष अध्यापनाचे दिवस हे अपेक्षित अध्यापन तासिका-दिवसांच्या तुलनेत कमी भरतात, हे स्पष्ट आहे.
सन २०१५ मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने (National Sample Survey Office) (NSSO) प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षण करून आपल्या अहवालात हे स्पष्ट केले आहे की, प्रत्येक चार विद्यार्थ्यांतील एक विद्यार्थी खासगी शिकवणी धरतो. म्हणजे कोचिंग क्लासेसना जाण्याचे अधिकृत प्रमाण २५ टक्के आहे. शिकवणीचे स्वरूप भिन्न आहे. व्यक्तिगत शिकवणी, खासगी शिकवणी, सामुदायिक सार्वजनिक शिकवणी, शिवाय काही शाळा, महाविद्यालयांत निकालकेंद्रित शिकवणी वर्ग (अधिकचे अध्यापन) योजण्यात येतात. त्यांना ‘व्हेकेशन कोचिंग' मेरिट ट्रेनिंग, स्लो लर्नर्स बॅच असे रूप