पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/28

हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारतातील अपेक्षित सुधारणा
 भारतात उत्कृष्ट शिक्षक घडायचे असतील तर खालील बदल होणे अपेक्षित आहे.
१. शिक्षण हा केंद्रीय विषय करून त्याला योजनेच्या ६ टक्के आर्थिक तरतूद करणे.
२. सार्वत्रिक व अनिवार्य शिक्षणाच्या धोरणापुढे जाऊन गुणवत्ताप्रधान शिक्षणाचा आग्रह धरायला हवा.
३. विद्यार्थ्यांच्या प्रगतीस शिक्षकांना जबाबदार धरायला हवे.
४. सेवाज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नतीऐवजी पात्रता विकास, प्रयोगक्षमता, संशोधन, कृती कार्यक्रम, लेखन, प्रबोधन, समाजकार्य, विषयज्ञान विकास यांसारखे निकष निर्धारित करायला हवेत.
५. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाची कार्यक्षमपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
६. पुरस्कार व अमान्यता (शिक्षा नव्हे) दोन्हीस महत्त्व हवे; तर चांगले शिक्षक व्यवसायात येतील व चुकार बाहेर जातील.
७. शिक्षण हे स्वायत्त क्षेत्र जाहीर करून प्रशिक्षण, भरती, नियुक्ती, पदोन्नती या संदर्भात पारदर्शक यंत्रणा निर्माण होणे गरजेचे आहे.
८. वेतनवाढीचा संबंध क्षमताविकासाशी जोडणे.
९. प्रवेश देणगी, नियुक्ती देणगी, प्रशिक्षण देणगी इत्यादींवर बंदी आणावी.
१०. कायम विनाअनुदान पद्धत बंद करून ‘समान शिक्षण, समान नियंत्रण तत्त्व अंगीकारावे.
११. गुणवत्ता निकष सरकारी, निमसरकारी, खाजगी सर्व संस्थांना समान असावा.
१२. शिक्षक, शिक्षण व संस्था यांचा किमान दर्जा निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.
१३. लेखन, संशोधन, प्रकल्पांना प्रोत्साहन अनुदान द्यावे.
१४. उत्कृष्ट शिक्षकाची घडण ही निरंतर प्रक्रिया म्हणून विकसित करावी.,

१५. शिक्षक पुरस्कार बंद करून निरंतर विकासाधारित पदोन्नतीचे तत्त्व अंगीकारावे.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/२७