रौप्योत्सवी सृजन आनंद शिक्षण
‘सृजन आनंद शिक्षण केंद्र, कोल्हापूर' सन १९८५ पासून कार्यरत आहे. या संस्थेमार्फत ‘सृजन आनंद विद्यालय' ही प्रायोगिक शाळा चालविली जाते. लीलाताई पाटील या प्रयोगाच्या अर्ध्वयू, त्या बी. एड. कॉलेजच्या प्राचार्या होत्या. २८ वर्षांच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयातील अध्यापनाच्या कार्यातून सुटका झाल्यावर त्यांनी प्रयोगशील शिक्षणाचा प्रयत्न सुरू केला. त्या ज्या शासकीय सेवेत होत्या, तेथील बांधीव रचनेमुळे त्यांच्यासारख्या स्वतंत्र नि प्रयोगशील शिक्षकाची घुसमट व्हायची. असे असले तरी ‘पावलापुरता प्रकाश' या न्यायाने त्या शासकीय सेवेत असतानाही प्रयोग करीत राहिल्या. यंत्रणेस टक्कर देत प्रयोग करण्यात माणसाची दमछाक होते हे खरे आहे; पण कर्ता माणूस कुठेही गप्प राहत नाही. वाचन, मनन, लेखन, प्रयोग व नवोपक्रम अशी पंचसूत्री मनात ठेवून त्या सतत धडपडत राहिल्या. श्रीमती महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालय, कोल्हापूर येथे त्या प्राचार्या असल्यापासून मी त्यांना जवळून ओळखतो. त्या संस्थेचा त्यांनी साजरा केलेला सुवर्णमहोत्सव त्यांच्या सर्जनशीलतेस साजेसाच होता असे आजही स्मरते.
सन १९८५ साली सृजन आनंद शिक्षण केंद्रे सुरू झाल्यापासून मी त्यांचा एक साक्षीदार आहे. बंदिस्त शिक्षणास छेद देऊन स्वतंत्र विचाराचा विद्यार्थी घडविण्याचा ध्यास घेऊन सृजन आनंद शिक्षण केंद्राची सुरुवात झाली. प्रथम केंद्र सुरू झाले. मग त्यांना औपचारिक मान्यता देण्याच्या दृष्टीने विद्यालय सुरू झाले. भारतीय प्रयोगशील शिक्षणाची मानसिकता नसलेल्या आपल्या पाल्यावर प्रयोग करायला पाच-पंचवीस पालक तयार झाले असते तर