पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/106

हे पान प्रमाणित केलेले आहे.

"मग काय म्हणत होता?"
 "फारसं काही म्हणण्याच्या मन:स्थितीत नव्हताच."
 "फार वाईट गोष्ट झाली, नाही?"
 "हो ना. माणसं स्वत:च्या आयुष्याचं काय करून घेतात! माझा तर विश्वासच बसेना पहिल्यांदा. वाटलं. मस्करी करतोय. पण मग हे प्रकरण वेगळंच दिसलं."
 तिला एकदम जाणवलं, की गोष्ट नुसती वाईटच नव्हे, फार भयानक झाली. तशी तिच्या माहितीतली अनेक लग्नं मोडली होती किंवा कुठल्या क्षणी मोडणार अशा अवस्थेत लंगडत वाटचाल करीत होती. त्यात दु:ख करण्यासारखं तिला काही सापडलं नव्हतं. पण माधवी आणि हेमाचं लग्न मोडणं म्हणजे शाश्वत मानल्या गेलेल्या तत्त्वाने एकदम आपण सापेक्ष असल्याचं उघड करण्यासारखं होतं. त्यांच्यासारख्यांच्या जवळ येण्यात दोन माणसांच्या केवळ बेरजेपेक्षा जास्त काहीतरी असतं, जे त्यांच्या दूर होण्यानं नष्ट होतं.
 ती तिरीमिरीने म्हणाली, "असं व्हायला नको होतं."
 "झालंय तर खरं आता."
 काही वेळ न बोलता त्यांचे घासामागून घास जात होते. मग मेल्यावर दुखवट्याला आलेली माणसं जशी काहीतरी बोलायचं म्हणून प्रश्न विचारतात तसं त्यानं विचारलं. "तुला कसं कळलं?"
 "कॉमनरूममध्ये मिसेस घाटे सांगत होत्या. माधवी इथंच एका मैत्रिणीच्या खोलीवर राहिलीय. ती मैत्रीण मिसेस घाट्यांची कुणी लागते म्हणे"
 "छान!" तो म्हणाला. "म्हणजे ही बातमी जगभर पसरायला काही वेळ लागायला नको. काय पण मैत्रीण!"
 "ही बातमी गुप्त राहिली काय नि पसरली काय, त्यामुळे फरक होणार आहे?"
 "कदाचित हे सगळं पेल्यातलं वादळसुद्धा ठरेल. पण एकदा गोष्ट षटकर्णी झाली म्हणजे त्यांची परत दिलजमाई होण्यातला तो एक अडथळाच ठरणार."
 तिनं मान हलवली. "मला नाही वाटत त्यांची दिलजमाई होईल म्हणून."
 "तू तरी निराशावादीच आहेस. कशावरून होणार नाही? थोडे दिवस लांब राहिली की एकमेकांवाचून करमायचं नाही त्यांना."
 ती मान हलवतच राहिली. "तुला हेमा काय म्हणाला मला माहीत

कमळाची पानं । १०६