पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/122

हे पान प्रमाणित केलेले आहे.

केल्या.
 "काय म्हणत्येय आई तुमची?" रागिणीनं विचारलं.
 तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता विक्रम म्हणाला, "हे पत्र नक्की आजच आलं?"
 "हो रे. इतका विश्वास नाही का माझ्यावर?"
 "बऱ्याच दिवसांपूर्वी पाठवलेलं आहे, म्हणून विचारलं. आणि पोस्टाचा शिक्का नाहीये त्याच्यावर. कुणीतरी आणून दिलं ना?"
 "हो."
 "कुणी?"
 "मला काय माहीत? होता कुणी माणूस."
 "कसा दिसत होता?"
 "होता चार माणसांसारखा." रागिणीला जरासा राग यायला लागला होता. एका पत्राबद्दल एवढं चर्वितचर्वण कशासाठी व्हावं?
 "घंटा वाजली म्हणून दार उघडलं तर तो दारासमोर उभा होता पत्र हातात देऊन चालता झाला. मी धड बघितलंही नाही त्याच्याकडे."
 "हे एक महिन्यापूर्वी लिहिलेलं आहे." विक्रम म्हणाला.
 "जाऊ दे ना विक्रम," शमा म्हणाली. "तिनं ज्याच्याजवळ दिलं तो विसरला असेल, किंवा त्याला इथपर्यंत पोचायला वेळ लागला असेल.
 "इतका वेळ?"
 रागिणी म्हणाली, "तुला काय म्हणायचंय ते सरळ सांग ना."
 "रागिणी!" धरम इतक्या वेळानंतर एकदम बोलला, इशारेवजा एकच शब्द.
 "तू ह्यात पडू नको धरम. विक्रम, तुला काय म्हणायचंय? की ते पत्र आधीच आलं होतं आणि मी तुमच्यापासून लपवून ठेवलं?"
 "तशी शक्यता आहे."
 "पुष्कळ दिवस पत्र तुमच्यापासून लपवून ठेवून मग तुम्हाला देण्यात काय स्वारस्य आहे? त्याऐवजी मी ते फेकूनच दिलं नसतं का? निदान सहज तुमच्या हातात पडेल असं तरी ठेवलं नसतं. मी अतिशय दुष्ट आहे असं आपण धरून चाललो तरी मी इतकी मूर्ख आहे असं तुला का वाटलं?"
 शमा म्हणाली, "विक्रम, पुरे झालं. सोडून दे."
 विक्रमने थोडा वेळ तिच्याकडे पाहिलं आणि शेवटी म्हणाला, "ठीक

कमळाची पानं । १२२