"माझ्याही सहनशक्तीचा विचार कर की! मला काय यातना होतात ते तुला दिसत नाही? मी काही करू शकत नाही. किती दिवस झाले मी शाळेत गेलो नाही. आमच्या ग्रुपच्या मीटिंग, चर्चा कशाकशात रस वाटत नाही मला. आयुष्यातनं उठल्यासारखा झालोय मी."
"त्याला मी काय करू? हे सगळं तु स्वत:वर ओढवून घेतलंयस."
"बरोबर आहे. अगदी बरोबर. तरी आनंदा मला सांगत होता तू मनीषाशी लग्न करू नको. ती कसल्या प्रकारची बाई आहे तुला माहीत नाही. त्या चळवळीतल्या कुणाशी तरी तिचं लफडं आहे. पण मी त्यावेळी कुणावरच विश्वास ठेवला नाही."
"आणि आता तुला त्याचा पश्चाताप होतोय ना? मग मी कायमची तुला सोडून जाते म्हटलं तर तू का ऐकत नाहीस?"
"कारण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही."
"मग मी काय करावं तूच सांग. कारण तुझे आरोप मला असह्य झाले आहेत मी हे असं जगू शकत नाही, आणखी एक दिवससुद्धा."
"तू फक्त कबूल कर. जे काही खरं असेल ते कबूल कर. मग पुन्हा तुला त्रास देणार नाही. त्याचा उल्लेखही करणार नाही."
"ठीक आहे," ती संथ, पराभूत स्वरात म्हणाली, "तुला वाटतंय ते खरं आहे, मी आपल्याकडून किशोरनं तू नसताना इथं येऊ नये असा खूप प्रयत्न केला. पण तो येतच राहिला. तू सबंध दिवस बाहेरच असायचास सोबत फक्त दोन लहान मुलं. मला अगदी तुरुंगात टाकल्यासारखं वाटायचं, किशोर आला की तेवढंच बरं वाटायचं गप्पा मारायला, बोलायला कुणीतरी मिळालं म्हणून. पण त्यातनं आमची जवळीक वाढत गेली आणि एक दिवस आमच्याकडून नको ते घडलं."
ती गुडघे जवळ घेऊन त्यांना हातांची मिठी मारून बसली होती, हनुवटी टेकून जमिनीकडे नजर लावून. आता पुढे काय होणार त्याच्या हातात होतं. तिला इच्छाशक्ती उरलीच नव्हती.
तो म्हणाला, "हे पहिल्यांदा कधी घडलं?"
"मला नक्की आठवत नाही."
"पण बऱ्याच दिवसांपूर्वी?"
"हो."
"मग पुन्हा पुन्हा घडत गेलं?"
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/136
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । १३६