हे पान प्रमाणित केलेले आहे.

 “शिरीष, तू नाही ना मला असाच सोडून जाणार? राजाचे मंत्रिपद तुला मोह नाही ना पाडणार? तू गेलास तर मी अशीच ओरडत बसेन. तुझी करुणा रडत बसेल. नको हो जाऊ.”

 “ नाही जाणार. तुम्हाला कोणालाही सोडून मी जाणार नाही.”

 “ शिरीष, लवकरच आपल्या विवाहाचा वाढदिवस येईल.”

 “ यंदा थाटाने साजरा करू. शेजारच्या गावचे गवई बोलावू.”

 आणि लग्नाचा वाढदिवस आला. बागेत तयारी करण्यात आली. सुंदर फुले फुलली होती. मध्ये गालिचा होता. रात्री मुख्य जेवण झाले. सुखदेव व सावित्री, शिरीष व करुणा तेथे होती. शिरीषचा मित्र प्रेमानंद तोही तेथे होता. गायनवादन सुरू झाले. आकाशात चंद्र होता. मंद वारा ཧवाहात होता. फुलांचा परिमळ सुटला होता. आनंदाला भरती आली होती.

 “ करुणा, तू म्हण तुझे आवडते गाणे.” शिरीष म्हणाला.

 “ माझा गळा चांगला नाही.” ती म्हणाली.

 “ तुझा गळा मला गोड वाटतो. म्हण !”

 आणि करुणेने आढेवेढे न घेता ते गाणे म्हटले

  “ कर्तव्याचा जीवनात सुगंध ”

  सत्प्रेमाचा जीवनात आनंद ॥ ध्रु० ॥

   चिता नाहीं मातें

   सेवा होई हातें

  मुक्त आहे जरी संसार-बंध ॥ कर्त० ॥

   भाग्य माझे थोर

   नाही कसला घोर

  प्रभु पुरवी माझे सारे संच्छंद ॥ कर्त० ॥”

  परंतु ही कसलो तिकडे गडबड ! घोडेस्वार दौडत आहेत. टापटाप आवाज येत आहेत. सारे घाबरले. गाणे संपले. आनंद अस्तास गेला. तो पाहा एक दिवा मालवला, आणि चंद्रही खाली वळला. अंधार होणार वाटते !

 “ काय रे शिरीष, काय आहे ?” पित्याने विचारले.

शिरीष * १३