पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टीकाकार विष्णुशास्त्री । ८७

पणाने चालविणें आम्हांस उचित होणार नाही. कां की, आमच्या प्राचीन भाषेचा पुरस्कार पाश्चात्त्य पंडितांनी जर घेतला नसता तर तिची काय दुर्दशा झाली असती, हें सांगवत नाही. ग्रीक व रोमन ग्रंथांची रानटांच्या स्वाऱ्यांत जशी धुळधाण झाली व संस्कृत ग्रंथांचा मुसलमानांच्या तडाक्यांत जो नाश झाला तो मनांत आणला असतां, ज्या रसिक व थोर मनाच्या लोकांनी आमच्या जुन्या विद्येचें संपादन केलें, तिचें रक्षण केलें व तिचा सार्वत्रिक प्रसारहि केला, त्यांचे उपकार साऱ्या भारतवर्षीय जनांवर केवढे आहेत हे सहज ध्यानांत येईल."
 भारतीयांत स्वत्व-जागृति करणें हें विष्णुशास्त्री यांचें जीवितकार्य होतें. संस्कृत साहित्य- भांडाराच्या दर्शनाने तें साधेल म्हणून त्यांनी त्याच्या सौंदर्याचें दर्शन त्यांना घडविलें; आणि या कामी पाश्चात्त्य पंडितांनी अनमोल साह्य केलें म्हणून त्यांच्याविषयीची पराकाष्ठेची कृतज्ञता त्यांच्या मनांत वसत आहे. त्यांच्या देशप्रेमाचें हें मोठें मनोज्ञ दर्शन आहे.