पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/११२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-१३-

निबंधकार विष्णुशास्त्री



 निबंध ही विष्णुशास्त्री यांनी मराठींत आणलेली तिसरी नवी ग्रंथ-पद्धति होय साहित्य-समीक्षा ही पहिली, चरित्र ही दुसरी आणि निबंध ही तिसरी ग्रंथ-पद्धति किंवा वाङमयप्रकार होय. भारताची प्राचीन संस्कृति ही मोठी उन्नत असूनहि येथे इतिहास किंवा चरित्र ही पद्धति आली नाही त्याचप्रमाणे निबंध हीहि पद्धति प्राचीन काळी कोणी अवलंबिली नाही; आणि इतिहास-लेखन झालें नाही म्हणून आपलें एकपट नुकसान झाले असले, तर निबंध लेखन झालें नाही यामुळे शतपट नुकसान झालें आहे.
 निबंध ही विचारप्रधान रचना आहे. बुद्धीला आवाहन करणें, तर्कशास्त्रीय पद्धतीने तिला आपले सिद्धान्त पटवून देणें, हें तिचे उद्दिष्ट आहे. एक विचारबीज मनांत येतांच त्याविषयीची सर्व माहिती संकलित करणें, तिचें वर्गीकरण करणें, मग तिची व्यवस्थित रचना करणें व त्यांवरून शेवटीं निष्कर्ष काढणें या पद्धतीने मानवी मनांत ग्रंथ किंवा निबंध तयार होतो. तसा तो तयार झाल्यावर विषयाचें महत्त्व, त्याचीं कारणें, त्याचें पूर्वरूप, सध्याचें रूप, रूढ समज, सत्य-दृष्टि, विरोधी विचार, आक्षेप, खंडन, मंडन, इतर पंडितांच्या तसल्याच विचारांशी तुलना, ऐतिहासिक दृष्टींतून समीक्षण, परिणाम, अन्वयव्यतिरेक दृष्टीने तपासणी, उपाय- चिंतन इत्यादि विविध अंगोपांगांनी त्याचा विकास करून त्याचा वटवृक्ष तयार करणें, ही निबंधरचना होय. या रचनेसाठी जें साहित्य जमवावयाचें तें सर्व अनुभव, इतिहास, तर्क, प्रयोग, अवलोकन यांच्या साह्यानेच जमवावयाचें, असा निबंधकाराचा कटाक्ष असतो; कारण त्याला लोकांच्या बुद्धीला आवाहन करावयाचें असतें.