पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/176

हे पान प्रमाणित केलेले आहे.

जीवन विकासाची त्याची आपली अशी ‘बहुसूत्री होती. स्पष्टवक्तेपणा, मन भरून ऐकणं, विचारपूर्वक कृती, द्रष्टं नियोजन, मोठेपणा द्यायची उदारता, अरभाट वाचन, संगीत संग्रह, चोखंदळ पाहणं, निसर्गवेड अशा कितीतरी गोष्टी अवीच्या स्वतःच्या होत्या. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ, कनिष्ठ कार्यकर्त्यांतील काही ‘पंच परमेश्वर' तो हेरून होता. त्यांच्याबद्दलची त्याची ठाम मतं होती. मत व्यक्त न करता अशा लोकांपासून आपली चळवळ, आपलं कार्य सुरक्षित कसं राहील, कार्यहानी कशी होणार नाही याची तो काळजी घ्यायचा.

 अवीला मुलांचं वेड होतं. मुलांसाठी काही करण्याची त्याची धडपड असायची. मुलांची छायाचित्रं काढणं, मुलांत खेळणं, मुलांचं करणं त्याचा एक अकृत्रिम छंद होता. मुलं-घरची नि दारची असा दुजाभाव त्याच्यात नसायचा. मुलांचा तो बाबा, काका, दादा, मामा सर्व असायचा. नात्याच्या वडिलकीचं जू त्यानं आपल्या मानेवर कधी वागवलं नाही. जीवन समरसून जगायची कला त्यानं विकसित केली होती. अवीत दुसऱ्याला देण्याची उदारता होती. ही कॅसेट कुणाला आवडेल, हे पुस्तक कुणाच्या संग्रही असलं पाहिजे, हा शेर कुणाला ऐकवायचा, हे चित्र कुणाला दाखवायचं, ही कल्पना कोण चांगली साकारेल याचा अवीचा वेध टिपणारा असायचा. अवि हरहुन्नरी होता. गाडी चालवणं त्याला आवडायचं. उठून जंगलात निघायचा. कधी कामगार संघटनेच्या कोपरा सभांत तो मनापासून बोलायचा. तोडा, फोडा, झोडा ही त्याच्या कामाची मूलभूत शैली नव्हती. समझोता त्याची पहिली पसंती असायची. पण कामगारांना हवं ते पदरात पाडून घेण्यात मात्र त्यानं कधी न कुचराई केली न काटकसर. तसं ‘शठं प्रति शाठ्य्म' वागण्याचा त्याचा रिवाज होता. कुणी अधिकारी फेरीवाल्यांना जेरीला आणायचं म्हणून ‘ब्ल्यू गार्ड’ घेऊन फिरू लागला तर अवी रेड ब्रिगेड' उभा करायचा. 'गांधी' नाटकासंबंधी शाहू स्मारकाच्या व्हरांड्यात घेतलेला परिसंवाद कोण उधळू पहातंय लक्षात आल्यावर त्याची ‘अॅटॉनॉमस आर्मी' आदेशाच्या आधीच सज्ज असायची. त्यांना तो लोकांचा रेटा लावून हैराण करायचा.अवी निष्णात वकील होता. वडिलांच्या अशिलांवर त्याची वकिली नव्हती. वडिलांच्या विचारांचं बळ त्याच्यात एकवटलं होतं.मृत्यूपूर्वी दोनच दिवस सांगलीच्या एक साखर कारखान्यातील कामगारांना न्याय मिळवून दिल्यानंतर त्याला कोण आनंद झाला होता.त्याची वकिली विचार, तत्त्व, मेहनतीवर आधारित होती. शोषितांचीच वकिली करण्याचा वडिलांचा वसा त्यानी चालवला होता. त्याच्या सादरीकरणावर, वैचारिक

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१७५