पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्य अथवा कर्मयोग

केल्यानें या विषयाचा अधिक ऊहापोह होईल व खरें काय याचा निर्णय करण्याला सोयीचें पडेल, अशा बुद्धीनें या विषयावर चारपांच ठिकाणीं निरनिराळ्या वेळीं जाहीर व्याख्यानें दिली. यांपैकी व्याख्यान नागपुरास सन १९०२ सालच्या जानेवारींत व दुसरे जगद्गुरु श्रीशंकराचार्य मठ करवीर व संकेश्वर यांच्यासमोर त्यांच्याच आज्ञेवरून संकेश्वरमठात सन १९०४ सालच्या आगस्ट महिन्यांत झालेले असून, नागपूर येथें दिलेल्या व्याख्यानाचा गोषवाराहि तेव्हां वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेला आहे. याशिवाय याच हेतूनें सवडीप्रमाणें कांही विद्वान मित्रांबरोबर खासगी रीतीने वेळोवेळी वादविवादहि केला. या मित्रांपैकींच कै. श्रीपातिबुवा भिंगारकर हे एक होते. यांच्या सहवासानें भागवत संप्रदायांतील कांहीं प्राकृत ग्रंथ पहाण्यांत येऊन, गीतारहस्यांत वर्णिलेल्या कांही थोड्या गोष्टी बुवांच्या व आमच्या वादाविवादांतच प्रथम निश्चित झालेल्या आहेत. बुवा हा ग्रंथ पहाण्यास राहिले नाहींत ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. असो; अशा तऱ्हेनें गीतेंतील प्रतिपाद्य विषय प्रवृतिपर आहे हें मत कायम होऊन, व तें लिहून काढण्याचें ठरूनही,बरीच वर्षें झाली. पण हल्लीं उपलब्ध होणारीं भाष्यें, टीका किंवा भाषान्तरे यांत न स्वीकारिलेलें हें गीतातात्पर्य,नुस्तें म्हणजे पूर्वीच्या टीकाकारांनी ठरविलेलें तात्पर्य आम्हांस कां ग्राह्य नाही याची कारणे न दाखवितां, पुस्तकरूपानें प्रसिद्ध केल्यास पुष्कळ गैरसमज होण्याचा संभव होता; आणि सर्व टीकाकारांच्या मतांचा संग्रह करून त्यांतील अपुरेपणा साकारण दाखविण्याचें, आणि गीताधर्माची ईतर धर्माशीं किंवा तत्वज्ञानांशीं तुलना करण्याचें, काम बऱ्याच प्रयासाचें असल्यामुळें, तेंही थोडक्या कालांत नीट उरकण्यासारखें नव्हतें. म्हणून आम्ही गीतेवर एक नवीन ग्रंथ लवकरच प्रसिद्ध करणार आहों, असें आमचे मित्र रा. रा. दाजीसाहेब खरे व दादासाहेब खापर्डे यांनी थोड्या घाईनें आगाऊच जरी जाहीर केलें होतें, तरी आपली सामग्री अद्याप पुरी नाहीं असें वाटून ग्रंथ लिहिण्याचें काम दिरंगाईवर पडत चालले; आणि पुढें सन १९०८ सालीं शिक्षा होऊन ब्रम्हदेशांत मन्दले शहरी जेव्हां आमची करण्यांत आली, तेंव्हा तर हा ग्रंथ लिहिण्याचा संभव बहुतेक खुंटल्यासारखाच झाला होता. परंतु ग्रंथ लिहिण्यास अवश्य लागणारीं पुस्तकादि साधनें पुण्याहून तेथें नेण्याची परवानगी कांही कालानें सरकारच्या मेहेरबानीनें मिळाल्यानंतर सन १९१०-११च्या हिंवाळ्यांत (शके १८३२, कार्तिक शुद्ध १ ते फाल्गुन वद्य ३० च्या दरम्यान) या ग्रंथाचा खर्डा मन्दलेच्या तुरुंगात प्रथम लिहून काढिला; आणि पुढें वेळोवेळी सुचत गेल्याप्रमाणें त्यांत सुधारणा केली, व तेव्हां सर्व पुस्तकें जवळ नसल्यामुळें कित्येक स्थळीं जो अपुरेपणा राहिला होता तो तेथून सुटका झाल्यावर पुरा करून घेतला. तथापि अद्यापहि हा ग्रंथ सर्वांशीं