कृष्णशास्त्री चिपळूणकर. १५
असे शास्त्रीबोवांमध्ये अनेक वर्णनीय गुण होते. तेणेंकरून शास्त्रीबुवा हे
सगळ्या महाराष्ट्र देशास अत्यंत भूषणप्रद झाले होते. हे गुण प्रदर्शित करणारी
अनेक कृत्ये त्यांचे हातून घडली आहेत. त्यांचें साद्यंत वर्णन करणें हें आह्मी
त्यांच्या चरित्रकारांकडे सोपवितों.
मोक्षमुल्लर ह्या विद्वान् पुरुषानें बन्सेन् ह्या नामांकित जर्मन गृहस्थाचें
चरित्र थोडक्यांत लिहिले आहे. त्याच्या शेवटी त्यानें असें म्हटले आहे कीं,
“ मरण पावलेल्या थोर मित्रांच्या गुणांचे वर्णन करावें, त्यांच्या नांवांस बहुमान
द्यावा, आणि त्यांकरितां शोक करावा, हें आपलें मुख्य कर्तव्यकर्म आहे, असे
कोणी समजूं नये; तर त्या मृत मित्रांच्या इच्छा काय होत्या, आणि कोणत्या चांगल्या
गोष्टी करण्याविषयी त्यांचा आग्रह होता, तें पूर्णपणे समजून घेऊन त्या इच्छां-
प्रमाणें चालणें आणि त्या गोष्टी करण्याविषयीं झटणें हें आपले पवित्र आणि
उत्तम कर्तव्यकर्म होय. " हे कृष्णशास्र्यांच्या मित्रांनी आणि एकंदर महाराष्ट्र-
जनांनी मनांत ठेवून त्याप्रमाणे वर्तावें.
अशा प्रकारचा पुरुष पुनः मिळणे फार दुर्लभ शास्त्रीबोवांची जागा कोण
व केव्हां भरील ती भरो. परंतु तसा पुरुष आज दिसत नाहीं. अशा व्यक्ति
वारंवार होत नाहींत. तेव्हां शास्त्रीबोवांचे मरणानें जी आज महाराष्ट्राची
हानि झाली आहे तिची भर कशानेही आज होईलसें दिसत नाहीं. तर उपाय
मिळून इतकाच की
“ ठेविले अनंते तैसेंचि रहावें ।
चित्तीं असों द्यावें समाधान ॥ "
तुकाराम.