पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/97

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पडतो...पण दादा पट्टीचे, हाडाचे कार्यकर्ते...पुनश्च हरिओम करत बैराग्याच्या वैरागी मनाने नवा डाव मांडायचा ठरवलं!
 'समवेदना' हे सह्याद्री हॉस्पिटल प्रा. लि. चे असे अपत्य की, जे तुमच्या आरोग्याची काळजी घेत दुसऱ्यांच्या आरोग्यास वरदान देते. म्हणजे असं की, तुम्ही ५००० रुपये भरायचे. तुम्हाला काही झालं तर सह्याद्रीचा हा आरोग्य डोंगर तुमच्या पाठीशी राहणारच; पण समजा तुम्हाला नाही काही झालं (होऊ नये हीच इच्छा) तर तुम्ही ज्याला काही झालंय अशा गरीब, निराधाराची शिफारस केली तर तोच डोंगर तसाच तुमच्यामागं उभा! गरिबांचं आरोग्यदायी कवचकुंडल ठरलेली ही योजना स्वत:च्या आयुष्यात कवडीचुंबक असलेल्या तांबोळी सरांनी यशस्वी करून दाखविली आणि रामराम ठोकला.
 नित्य मला नव्याचा सोस

 माझा पूर्वाश्रम ओस

 नसलेल्या जगाची आस

 हाच माझ्या जीवनाचा परिपोष!
 म्हणत रमाकांत तांबोळी सध्या आपल्या माहेरी, जन्मगावी लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या नादात स्नेहालयात डेरेदाखल आहेत. अवघे पाऊणशे वयोमान असलेला हा तरुण कार्यकर्ता गिरीश कुलकर्णी नावाच्या चाळिशीतल्या कार्यकर्त्यास सध्या घाम फोडतोय. माणसाचं जगणं नितळ असेल, तर ते कातळावरही नंदनवन फुलवण्याचं सामर्थ्य घेऊन येतं. स्नेहालय वेश्या, वेश्यांची मुलं यांच्यासाठी नगर, सोलापूर इथं अनेक उपक्रम करत. प्रतिबंधन, उपचार, संरक्षण, संगोपन, पुनर्वसन असा पाच पदरी गोफ गुंफत स्नेहालयाला एड्सग्रस्तांचं रुग्णालय उभारायचं होतं. रमाकांत तांबोळी यांनी ते मैत्रेय फाऊंडेशनच्या माध्यमातून सहज उभारून दाखविलं. 'अशक्य ते शक्य करिता सायास' हा रमाकांत तांबोळी यांच्या जीवन व कार्याचा अलिखित मंत्र, हा फॉर्म्युला ते मनुष्य संग्रहातून साकारतात. कार्यकांत रमाकांत म्हणजे 'नाही रे'चे आकांत! तो ऐकला की हा ओऽऽ देतो...हात पुढे करतो...गर्तेतून वर घेतो... चालता करतो अन् चालता होतो...परत नवं काम! पुढे कोणत्या संस्थेचा उद्धार ते काळालाच माहीत असलं, तरी हे मात्र निश्चित की, रमाकांत तांबोळी नावाचा माणूस घरकोंबडा होणे नाही. त्याच्या आर्मीला निवृत्ती नाही. म्हणून त्यांची आर्मी आपल्या आर्मीपेक्षा निराळी...साधना न करता नकाराचा प्रदेश जिंकत सकारात्मक जग निर्मिणारी ही 'वन मॅन आर्मी' म्हणून तर सदैव अजेय!

•••

निराळं जग निराळी माणसं/९६