हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुढच्या घटना एका पत्रावरून समजून घेणे चांगले. या भागातील एक सर्वोदयी कार्यकर्ता रतीलाल मराठे याने आपल्या मुंबईच्या कार्यालयाला लिहिलेले हे पत्र आहे. या पत्रात रतीलाल लिहितो -

 आपण मागितल्याप्रमाणे मी खालीलप्रमाणे माहिती पाठवीत आहे. आदिवासी समाज अशिक्षित व सुधारलेल्या भागापासून दूर अशा विखुरलेल्या भागात रहात असल्यामुळे व आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्यामुळे त्या विभागातील सावकार या आदिवासी समाजाची पालेमोड पद्धतीने, म्हणजे अल्प मुदतीचे कर्ज देऊन किंवा धान्यकर्ज देऊन शेतीचा माल निघाल्यावर दिडीने अगर दुपटीने वसूल करून घेतात. किंवा शेतीमध्ये राबवून दिलेले पैसे किंवा धान्य वसूल करून घेतात. त्यातील एक श्री. विश्राम हरी पाटील हे आहेत.
 पहिल्याने दोन चार आदिवासी पाटीलवाडी येथे आम्हाला खाण्यासाठी धान्य पाहिजे म्हणून तपास करण्यासाठी गेले असता श्री. जगन्नाथ विश्राम यांनी सांगितले की, उद्या येऊन धान्य घेऊन जा.

 ठरल्याप्रमाणे २-५-७१ रोजी शे-सव्वाशे आदिवासी येथे गेले. (इकडच्या आदिवासींच्या हातात नेहमीच हत्यारे असतात. काठी वगैरे) हातात काठ्या वगैरे होत्या.

 पाटीलवाडीला जाऊन आदिवासी जगन्नाथभाईंना भेटले व आम्हाला चारचार पायली दादर (ज्वारी) पाहिजे असे सांगू लागले. जगन्नाथभाई दोन-दोन पायली दादर देऊ असे सांगत होते. शेवटी चार-चार पायली धान्य देण्याचे कबूल केले व त्यांच्या सालदारांना सांगितले की, यांना प्रत्येकाला चार-चार पायली धान्य मोजून द्या. धान्य मोजून देत असता श्री. जगन्नाथभाई जवळच खुर्ची टाकून बसले होते. व त्यांच्या पत्नी पण उभ्या होत्या. याप्रमाणे धान्य मोजून दिल्यावर आदिवासी आपापल्या गावाला परत गेले. काही १२।१३ आदिवासी म्हसावदकडचे होते, तेही म्हसावदला आले. इकडे श्री. जगन्नाथभाईंनी पोलीस स्टेशनला तोंडी निरोप पाठविला. हा हा करता पोलीसयंत्रणा म्हसावदला येऊन पोचली. तसेच प्रत्येक गावचे गुजर लोक आपापली वाहने हत्यारे घेऊन म्हसावदला जमा झाले. म्हसावदकडे गाठोडे घेऊन येणाऱ्या आदिवासींना ते मारायला जात होते. पो. स. इ. श्री. भावसार यांनी गुजर लोकांना सांगितले की, तुम्ही गर्दी करू नका. मी आदिवासींना विचारपूस करतो. पण गुजर लोकांनी त्यांचे ऐकले नाही. आदिवासींना मारठोक चालू केली व बांधून ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. तसेच सर्व म्हसावद गावातील आदिवासींना घरात जाऊन मारले व बाहेर काढले. त्यांच्या घरातील सर्व धान्य जप्त केले. गुजर लोक जास्तच जमा झाले व आदिवासींना मारू पिटू लागले व ट्रॅक्टर्स करून इस्लामपूर लक्कडकोट येथे आदिवासींना मारण्यासाठी गेले.

शहादे । ९