हे पान प्रमाणित केलेले आहे.

अजून सावकारी पाशात अडकलेला का, या प्रश्नाचे हे उत्तर आहे. वेळेवर त्याला सावकारच उपयोगी पडतो. म्हणून आदिवासी त्याला सोडू इच्छित नाही. कर्ज निवारण हुकमाने हा सावकार हटणार नाही...कारण रात्री बारा वाजताही उपयोगी पडणारी दुसरी खात्रीची पर्यायी व्यवस्था अजून आदिवासींच्या-गरीब शेतमजुरांच्या दृष्टिपथात नाही. दृष्टिपथात आल्यावरही तिच्यावर विश्वास बसायला काही काळ, काही वर्षे उलटावी लागणार. तोवर त्यांच्या किरकोळ किरकोळ गरजा कोण भागवणार ?

 आणखी तीन-चार महिन्यांनी तर रोजगारही कमी होईल. त्या वेळी कोणती परिस्थिती उद्भवेल? आता आदिवासी-शेतमजूर पूर्वीसारखे उपाशीपोटी दिवस न दिवस स्वस्थपणे झोपडीत पडून राहणार नाहीत. त्यांना चळवळी कशी करायच्या, शांततापूर्ण मार्गांनी आपल्या रास्त मागण्या,कायदेशीर मागण्या कशा मान्य करून घ्यायच्या याचे शिक्षण मिळालेले आहे. कोणी दिले हे शिक्षण?

 हे शिक्षण देण्याचे काम Positive, विधायक, मूलभूत महत्त्वाचे नाही का?

 ज्यांचे अविष्कार स्वातंत्र्य सध्या हिरावले गेले आहे अशा काही 'मूठभर' सुशिक्षितांनी, काही जबाबदार राजकीय कार्यकर्त्यांनी हे काम आजवर स्वयंप्रेरणेने केले ही वस्तुस्थिती आहे. ही स्वयंप्रेरणा नष्ट करून काय साधणार आहे ?

 स्वयंप्रेरणा ही स्वतंत्र वातावरणात वाढणारी वनस्पती आहे. स्वतंत्र वातावरणाचा कदाचित कुणी दुरुपयोगही करीत असतील; पण त्यासाठी वातावरणच दूषित करून टाकायचे, कोंडी निर्माण करायची, सगळ्यांनाच गुदमरायला लावायचे, हे योग्य नाही. नोकरशाहीच्या हाती आता तुफान सत्ता केंद्रित झालेली आहे. या सत्तेचा गैरवापर होत नसेल का ? धोके सगळीकडे, सगळ्याच व्यवस्थेत असतात; पण स्वातंत्र्य असणारी व्यवस्था त्यातल्या त्यात चांगली..कारण ती बदलता येते, सुधारता येते. स्वातंत्र्य नसेल तर दडपादडपी, खोटेपणा वाढत जातो. खरे काय ते कळेनासे होते. असंतोष दबून राहतो, आतल्या आत धुमसणे-खदखदणे सुरु असते. राज्यकर्ते खोट्या समाधानात मश्गुल राहू लागतात. वातावरण मोकळंं,स्वतंत्र, स्वच्छ असले तर हा असंतोष विधायक मार्गांनी बाहेर पडतो, ताण सैल होतात. यालाच लोकशाही प्रक्रिया म्हणतात. निवडणुका हे सत्ता वाटपाचे केवळ तंत्र आहे. हुकुमशाही व्यवस्थादेखील निवडणुकांचे तंत्र वापरून, आपण लोक वादी असल्याचा दावा करू शकते. या तांत्रिक देखाव्यापेक्षा महत्त्वाचा आहे, लोकशाहीचा आतला प्राण, मोकळं, स्वतंत्र वातावरण,निर्भय वृत्ती, सत्यप्रतिपादनाचे धैर्य, कर्तव्याची जाणीव, स्वयंप्रेरित कृती ही सर्व लोकशाहीची प्राणलक्षणे. ती येथे दिसणार नसतील तर निर्जीव कुडी असली काय अन् नसली काय, सारखेच. अशी वेळ न येवो.

तुकडे । १२३