हे पान प्रमाणित केलेले आहे.

खेड्यातल्या मुलाला अमेरिकेहून आयात केलेली दुधाची पावडर देणे आणि खेड्यातले दूध शहरात विकणे यात कसली शास्त्रीयता आहे ? शुद्ध आचरटपणा आहे हा. उत्पादन आणि वितरण यात काही समतोल, मेळ हवा. हा मेळ घालणे हा स्वयंपूर्णतेचा आशय आहे. उत्पादनापेक्षा वितरणात जास्त साधनसंपत्ती, मनुष्यबल गुंतवून ठेवण्यात काही हंशील नाही. तेव्हा व्यवहार्यतेच्या मर्यादेत, स्वयंपूर्ण आणि अद्ययावत असे ग्रामसमूह निर्माण करण्याचे कार्य येत्या पाच-दहा वर्षांत आपण युद्धपातळीवरून पार पाडणार असू, तरच केंद्रीकरणाचा प्रवाह उलटवता येणार आहे. नाहीतर गेली पंचवीस-तीस वर्ष जे चालू आहे तेच पुढच्या पंचवीस-तीस वर्षांतही होत राहील आणि समतोल व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था या देशात निर्माण होण्याची शक्यता आणखीनच दुरावेल.
 सरकारला हे करायला भाग पाडणं आणि यासाठी आवश्यक ते लोकसंघटन ग़ावोगावी उभं करणं हे एक महत्कार्य आहे. यापूर्वी लोकसंघटना आणि सरकार यांचा सांधा कधी जुळून आलाच नाही. लोकसंघटना अलिप्त राहिल्या, सरकार केवळ नोकरशाहीच्या बळावर योजना राबवीत गेले, दोन्ही पंख एकावेळी विस्तारले कधी गेलेच नाहीत. हा योग आता जमून येण्याची शक्यता उत्पन्न झाली आहे. जनता पक्ष सत्तेवर येवो न येवो, सत्तेला शह देऊ शकण्याइतपत तो आत्ताच ताकदवान आहे. एक प्रचंड अनुशासनबद्ध - लोकसंघटना पाठीशी उभी आहे. गरूडाने झेप घेण्याची ही वेळ आहे.
 नाही तरी राष्ट्रवादाचा नेमका आशय काय असतो ?
 गरूड होण्याचे एक भव्य स्वप्न.
 उंच आकाशातला मुक्त संचार.
 एक प्रबळ आकांक्षा-की हा देश वैभवाच्या शिखरावर नेऊच नेऊ.
 ही आकांक्षा बाळगणारे हजारो कार्यकर्ते हे जनता पक्षाचे खरे बळ आहे.
 हे बळ सगळे दिल्लीत खर्च होऊन उपयोगाचे नाही.
 त्याची सर्वात जास्त आवश्यकता आहे तिकडे ते प्रयत्नपूर्वक, जिद्दीन वळवले पाहिजे.
 दिल्ली आता फार दूर नाही.
 पण तो जंगलातला भिल्ल–कातकरी ?
 तो वलांडीचा गवत खाऊन दिवस काढणारा बनसोडे !
 ती झोपडपट्टीतली उघडी गटारे, नागडी मुले ?

 हा जनविराट आहे. अथांग. अक्राळविक्राळ. आसेतुहिमाचल पसरलेला.

निर्माणपर्व । १५४