हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांनी मशिनवर चालू असलेली पुढच्या अंकाची छपाई थांबवली आणि दुस-या दिवशी कॅपातल्या मुख्य आयुक्तांच्या कचेरीत हजर राहण्याचा हुकूम बजावून ते निघून गेले.
 दुसरे दिवशी ११ वाजता कॅपातल्या आयुक्तांच्या कचेरीत आम्ही तिघे हजर झालो. मी स्वतः, मुद्रक व सहसंपादक म्हणून दिलीप माजगावकर आणि स्नेही म्हणून बिंदूमाधव जोशी. डेप्युटी कमिशनरांच्या खोलीत आमचे पाऊल पडते न पडते तोच फोन वाजला. एका हाताने आम्हाला ‘बसा' असे खुणवीत डेप्युटी कमिशनरांनी फोन कानाला लावला. “Yes. Yes. He is just here' असे डे. कमिशनर फोनरून कोणाशी तरी बोलत होते. थोड्या वेळाने फोन संपला आणि त्यांनी म्हटलेः वेळेवर आलात. तुमच्यासंबंधीचाच दिल्लीचा फोन होता. तुमच्या मागील अंकावर अॅक्शन घेतली की नाही म्हणून चीफ सेन्सॉरने फोनवरून विचारणा केली.
 दिल्लीचे दडपण तेव्हा एकदम जाणवले.
 मी सगळा वर दिलेला युक्तिवाद केला. पण काही एक उपयोग झाला नाही. कडक ताकीद देणारे एक पत्र माझ्यासमोर ठेवण्यात आले. अंक तर जप्त झालाच होता. पण प्रेस वाचला.
 'Noted' असे पत्रावर लिहून मी सही केली. 'तुम्ही ताकीद दिलीत. तुमच्या हातात अधिकार आहे. ताकीद मला मिळाली. मी नोंद घेतली-' एवढेच मला कबूल करावयाचे होते. पत्रातील विधाने, बाकीचा मजकर मी मान्य केला नाही -करणे शक्यही नव्हते.
 प्रसिद्ध कायदेपंडित चंद्रकांत दरू यांचा प्रिसेन्सॉरशिप व मिसा कायद्याचे स्पष्टीकरण करणारा लेख ‘भूमिपुत्र' या गुजराथी नियतकालिकातून भाषांतर करून माणूस' साठी घेतला होता. पोलीस 'माणूस' कचेरीत आले तेव्हा या लेखाची छपाई सुरू होती. दुस-या दिवशी डे. कमिशनरांच्या कचेरीत या लेखावरूनसुद्धा वाद झाला. त्यांनी लेख प्रसिद्ध करायला मनाई केली. ऐनवेळी दुसरा मजकूर कुठून आणायचा? त्यामुळे १२ जुलैचा अंक निघूच शकला नाही.

 नंतरचा १९ जुलैचा अंक. आणीबाणी जाहीर होऊन पंधरा-वीस दिवसच जेमतेम उलटलेले आहेत. वातावरणात भीती दाटून राहिली आहे. पोलिसांकडे तेव्हा सेन्सॉरचे काम असल्याने त्यांची 'माणूस' कचेरीवर पाळत आहे. आणि तरीही या अंकातील ‘सोलकढी' सदरात अनंतराव भाव्यांनी एक काडी शिलगावून दिला. त्यांचा ‘नन्नाचा जाहीरनामा' पोलिसांच्या हातावर सफाईने तुरी देऊन पसार झाला• जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी अनंतरावांनी आणीबाणीला चक्क ‘पुटकुळावर नवे गळु' म्हटले आणि लिहिले-

निर्माणपर्व । १६४