हे पान प्रमाणित केलेले आहे.

पडलेले होते. रात्रीबेरात्री लोकांना यायलाजायला, मुक्कामाला ही जागा तशी सोयीची होती.
 नोंदींप्रमाणे ही जागा सरकारी होती.

 जागेची परवानगी अंबरसिंगने कुठून मिळवली कोण जाणे. पण जागेवर झोपडी बांधण्यासाठी लाकूडफाटा हवा, म्हणून मात्र अधिकाऱ्यांकडे त्याने विचारपूस केली.
 ‘नवीन झाडे तर आम्ही तुला तोडायला परवानगी देणार नाही. आदिवासीला जंगलातले जुने लाकूड झोपडी वगैरेसाठी घेण्याची मुभा असते. या नियमात बसत असेल ते तू कर.' अधिकाऱ्यांनी त्याला सांगितले.

 ‘पहा हं. नाहीतर झोपडी बांधून झाल्यावर तुम्ही लोक लाकडे बिगरपरवाना तोडून आणली म्हणून आम्हाला त्रास द्याल.' अंबरसिंगने खुंटा हलवून बळकट करून घेतलेला होता.

 कारण, नेहमीचा हा येथला अनुभव आहे. एखाद्या आदिवासीला छळायचे असले म्हणजे त्याच्या खोपटातले एखाद अर्धे लाकुड जंगलातून बिगरपरवाना त्याने तोडून आणले म्हणून पोलिसांनी–जंगलखात्यातील नोकरांनी-त्याला अडकवायचा आणि पैसे उकळत राहायचे.

 ही पुढची परवड नको म्हणून अंबरसिंगने फौजदार वगैरेंना शब्दाने आधीच बांधून घेतले.
 एका रात्रीत झोपडी उभी राहिली.

 सकाळपासून कुरबुरीला सुरुवात झाली.
 'ही जागा आमची आहे. मुसलमानांचे हे कबरस्थान आहे,' काही जणांनी हरकत घेतली.
 हरकत घेणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत गेली.
 वातावरण ताणले गेले.
 अंबरसिंगला बोलावणे गेले. तो आला.

 'जागा कागदोपत्री सरकारी मालकीची दिसली म्हणून आम्ही झोपडी बांधली. तुम्ही कशावरून म्हणता ही जागा मुसलमानांच्या मालकीची आहे ? तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांना तुमचे म्हणणे पटवून द्या. त्यांना जर ते पटले व त्यांनी आम्हाला जर सांगितले तर ताबडतोब आम्ही झोपडी काढून टाकू.' अंबरसिंगने चेंडु सरकारी कोर्टात ढकलून दिला.

निर्माणपर्व । २०