हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अंबरसिंगला वाटले असावे थोडी चाचपणी आता करून बघावी. आपल्या शक्तीचे सगुण स्वरूपात जरा दर्शन घ्यावे. इतरांनाही घडवावे. मंगल- मूर्तीच्या दर्शनाने अमंगलाला काही सुबुद्धी सुचते का ते पाहावे.

 किंवा मंगलमूर्तीनेही आदिवासींना प्रेरणा दिली असेल.

 घटना घडली खरी. आदिवासींनी गतवर्षी आपला स्वत:चा वेगळा गणपतीउत्सव शहाद्यात सुरू केला.

 यापूर्वी आदिवासी समाज गणपती उत्सवाकडे फारसा कधी फिरकलेला नव्हता. स्वत:चा वेगळा गणपती ही तर एक नवीनच स्फूर्ती.

 भराभर आदिवासी कार्यकर्ते कामाला लागले. शहाद्यात मोठी मूर्ती तयार नव्हती. मातीची अडचण होती. आदिवासी कार्यकर्त्यांनी कुठूनतरी माती गोळा करून आणली. मूर्तिकाराला गळ घातली. त्याने दिवसरात्र काम करून चांगली कमरेपर्यंत उंचीची मूर्ती तयार केली. वर्गणी जमलेली नव्हती. तेव्हा मूर्ती ' सप्रेम भेट ' हे ओघाने आलेच.

 उत्सव यथासांग सुरू होता. भजनकीर्तनांचे कार्यक्रम चालू होते. उगाच हवा पसरली, आदिवासी काही गडबड करणार ! शहाद्यात दंगल उसळणार !

 कारण आदिवासी-मुस्लिम तेढ या भागात पूर्वीपासून आहे. मुस्लिम समाज जास्तच सावध झाला. असे म्हणतात की, दंगलीच्या भीतीने मुस्लिम समाजापैकी काहींनी आपली कुटुंबे इतर सुरक्षित ठिकाणी या दोन चार दिवसांसाठी पाठवूनही दिलेली होती.

 उत्सवाच्या शेवटच्या दिवशी ताण खूप वाढला. आसपासच्या व लांबलांबच्या गावाहून आदिवासी समाज शहाद्याकडे लोटला होता. रात्रभर भजनांचे; कीर्तनांचे फड गाजत होते. गोमयी नदीच्या रिकाम्या विस्तीर्ण पात्रात सगळ्यांचे तळ पडलेले होते. असतील सुमारे आठ-दहा हजार तरी लोक.

 दहावा दिवस उजाडला. आदिवासींनी आपला गणपती मिरवणुकीने वाजत गाजत नेण्याचा आग्रह धरला. प्रथम पोलीस या मिरवणुकीला परवानगी देत नव्हते. मग त्यांनी सांगितले, ' तुमच्या महाराजांना बोलवा. ते जबाबदारी घेत असतील तर आम्ही परवानगी देऊ.'

 अंबरसिंग परगावी होता. तो दुपारी आला. बोलाचाली झाली. व्यवस्था ठरली. अंबरसिंगने सर्व हमी घेतली. एखादा अनुचित प्रकार घडला तर पोलिसांनी परस्पर हस्तक्षेप न करता संस्थेच्या एखाद्या कार्यकर्त्यामार्फत तो अनुचित प्रकार थांबवावा, ही अंबरसिंगची सूचना पोलिसांनीही मान्य केली.

शहादे । २५