हे पान प्रमाणित केलेले आहे.



म्हैसाळ




 आबा पिरू कांबळे 'माणूस' कचेरीत एका दुपारी उपस्थितांना आपल्या संस्थेची माहिती सांगत आहेत.

 उपस्थितात आहेत पुण्याच्या विद्यार्थी साहाय्यक समितीचे डॉ. अच्युतराव आपटे, साधना साप्ताहिकाचे संपादक यदुनाथ थत्ते, स्वातंत्र्यलढा व विधायक कार्य यांचा दीर्घ अनुभव व पुण्याई पाठिशी असलेले शिरूभाऊ लिमये, नारायणगावच्या सबनीस विद्यामंदिराच्या विस्तारकार्यात महत्त्वाची कामगिरी बजावणारे काँटिनेंटल प्रकाशनचे अनंतराव कुलकर्णी, महाराष्ट्र टाईम्सचे सहसंपादक व ‘युद्धनेतृत्व' कार दि. वि. गोखले, 'आनंदी गोपाळ' कर्ते श्री. ज. जोशी, 'नाझी भस्मासुराचा उदयास्त ' चे लेखक वि. ग. कानिटकर, पुणे विद्यापीठ वृत्तपत्र शिक्षण विभागाचे संचालक ल. ना. गोखले, स्वाध्याय महाविद्यालयाचे प्राचार्य महाजन-

 आबा पिरू कांबळे मिरजेजवळच्या म्हैसाळ गावचे एक हरिजन बांधव. 'हरिजन' आहेत हे सांगितले तरच समजावे इतके इतर समाजाशी मिसळून गेलेले. न्यूनगंडाचा लवलेश नाही. म्हैसाळ गावच्या दोनशे हरिजन कुटुंबांच्या जीवन परिवर्तनाचा अवघड प्रयोग आपण करतो आहोत याची उथळ जाहिरातबाजीही नाही. एक प्रसन्न, निर्मळ व्यक्तिमत्व. प्रयोग एका विशिष्ट टप्प्यावर येऊन थोडा अडखळला आहे. यातून वाट काढावी, प्रयोग पूर्णावस्थेला पोचवावा यासाठी चार मंडळींना ते भेटत आहेत. मदतीची नाही, सहकार्याची रास्त मागणी पुढे ठेवीत आहेत.

 कांबळे यांना सहकार्याचा पहिला हात मधुकर देवल यांचा लाभला. देवल हे रा. स्व. संघाचे एके काळचे प्रचारक. प्रचारकार्यातून निवृत्त झाल्यावर म्हैसाळ या आपल्या गावी ते शेती करू लागले. पण पिंड ध्येयवादी प्रचारकाचा असल्यामुळे केवळ शेती करावी, व्यवसाय भरभराटीस न्यावा, एवढ्यातच मन रमेना ! हळूहळू गावच्या आर्थिक–सामाजिक जीवनाची त्यांनी पाहणी सुरू केली. गावातील ताणतणाव त्यांनी जाणून घेतले. तीनशे एकर जमीन बाळगणाऱ्या कुटुंबापासून

म्हैसाळ । ६३