हे पान प्रमाणित केलेले आहे.



असा कांबळे-देवलांचा दृष्टिकोन आहे. गावचे वातावरणही आता खूप निवळले आहे, पूर्वी विरोधच होत होता. आता निदान मागितलेला सहकार तरी थोडाबहुत लाभत आहे.

 ' आनंदी गोपाळ' कर्ते श्री. ज. जोशी यांना ही भूमिका वास्तववादी वाटली. 'बरोबर आहे कांबळे म्हणतात ते. आपण इथे दोनशे मैलावर शहरात राहाणार. स्थानिक परिस्थितीची आपल्याला नीटशी कल्पना नाही. उगाच गरमागरम उपदेश इथे बसून करण्यात काय अर्थ आहे ?' असे श्री. जं. चे मत पडले.

 म्हशींबरोवर सोसायटीने हरिजनांना काही गाई देण्याचा प्रयोगही करून पाहिला. पण तो चांगलाच अंगलगट आला. उपस्थितांनी- विशेषतः अच्युतराव आपटे यांनी या अपयशाबद्दल कांबळे-देवल जोडीला चांगलेच धारेवर धरले. देवलांना शेवटी कबूल करावे लागले की, सोसायटीने हे धाडस करायला नको होते.

 गाय लाभली नाही, पण म्हशींनी चांगलाच हात दिला. सोसायटीचा कारभार उत्तम चालला, हरिजनांनी घेतलेली कर्जे परत केली, यामुळे मंडळींचा उत्साह अधिकच वाढला. म्हशींसाठी हिरवा चारा हवा म्हणून शोधाशोध सुरू झाली. यातून शेती सोसायटीच्या कल्पनेने मूळ धरले. वास्तविक हरिजनांकडे १९५२ पासून ३६ एकर वैरणीचे सरकारी रान होते. पण हितसंबंधी लोकांनी नाना क्लृप्त्या लढवून या जमिनी हरिजनांकडून केव्हाच लुबाडून घेतलेल्या होत्या. मग सावकारांकडे गहाण पडलेल्या हरिजनांच्या जमिनी सोडवून घेणे, हा एकच पर्याय उरला. देवलांच्या ओळखीने थोडीफार रक्कम कर्जाऊ, देणगी वा दीर्घ-मुदतीच्या ठेवी म्हणून गोळा केली गेली. यातून सावकारांची देणी देऊन जमिनी सोडवून घेण्यात आल्या व जमिनींचे एकत्रीकरण करून ' श्रीविठ्ठल संयुक्त सहकारी शेती सोसायटी ' या संस्थेची स्थापना करण्यात आली. जमीन असणाऱ्यांनी जमीन नसणाऱ्या शेतमजुरांनाही या संस्थेचे लाभ देण्याचे ठरवून सहकारी तत्त्वाला खरा अर्थ प्राप्त करून दिला. काही हरिजन स्त्रियांकडेही किरकोळ जमिनी होत्या. त्यांनीही सोसायटीच्या सामीलनाम्यावर सह्या-आंगठे उठवून हा सहकारी प्रकल्प उचलून धरण्यातील आपला वाटा पुरा केला.

 १ जानेवारी १९६९ या दिवशी मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या हरिजनांच्या-बहुधा महाराष्ट्रातील पहिल्या व एकमेव-सहकारी शेती संस्थेच्या कार्याचा शुभारंभ झाला.

 संस्थेकडे ९० एकर जमीन असून त्यापैकी सध्या तीस एकर पाण्याखाली आहे. माळाची आणखी २३ एकर जमीन लिफ्ट इरिगेशनखाली येण्यासारखी आहे. शेती सुधारणा, फळबागविस्तार, हरिजनांसाठी चांगली घरे, शास्त्रीय पद्धतीचे गोठे इत्यादी अनेक योजना संस्थेच्या कार्यक्रमपत्रिकेवर आहेत.

निर्माणपर्व । ६६