हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुख्य हेतू होता आपल्या दलाली अर्थव्यवस्थेच्या एखाद्या मोक्याच्या ठिकाणावर लहानसा प्रहार करण्याचा. हा प्रहार करण्यात आज शहरातील मध्यमवर्ग पुढे आला एवढेच. पण उद्या इतरांनाही आपापल्या जागेवरून असे लहानमोठे प्रहार करावे लागणार आहेत. त्याशिवाय परिवर्तनाची आशा बाळगणे व्यर्थ आहे. म्हणूनच मध्यमवर्गीयत्व हे काही या ऑपरेशनचे प्रमुख वैशिष्ट्य ठरू नये. आशय महत्वाचा. कोण माणसे, कुठला वर्ग पुढे येतो हा भाग गौण समजायला हवा.

 स्त्रिया अधिक संख्येने या आंदोलनात उतरल्या हेही वैशिष्ट म्हणून कुणी सांगतात. पण स्त्री-पुरुष हा फरकही याबाबतीत तसा विशेष महत्त्वाचा नाही. अलीकड अनेक क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. अगदी आदिवासी भागातील आंदोलनातही स्त्रिया उत्साहाने भाग घेताना दिसतात.

 ग्राहक चळवळीने जो हा प्रतिकाराचा फणा काढला, बहिष्काराचे जे हे, शस्त्र उपसले ते वास्तविक या 'ऑपरेशन'चे मुख्य वैशिष्ट्य आहे. तशी ग्राहक चळवळ महाराष्ट्रात काय किंवा भारतात इतरत्र काय, नवीन नाही. ग्राहकांसाठी सहकारी भांडारे आजवर बरीच चालवली गेली आहेत. पण हा फक्त वस्तूंच्या वाटपाचा प्रयत्न होता. पुण्यात प्रथमच हे घडले की, ग्राहक चळवळीने ही आपली जुनी मर्यादा ओलांडली आणि आक्रमक धोरण स्वीकारले. मिळतील त्या भावात, मिळतील तितक्या वस्तूंचे समान वितरण करण्यावर समाधान न मानता पुण्यातील ग्राहक संघटित होऊन प्रथमच म्हणू लागले की, जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्वसामान्य माणसाला परवडतील असे असले पाहिजेत. चालू भावातली वाढ गैर आहे, नफेखोरीमुळे ती अवास्तव व बेफाट वाढलेली आहे. ही नफेखोरी कमी झाली पाहिजे. यासाठी उत्पादन व वितरण तंत्रात व यंत्रणेत जे दोष असतील ते काढून टाकले पाहिजेत, हे होत नसेल तर आम्ही यासाठी चळवळ करून, बहिष्कारापासून सत्याग्रहापर्यंत प्रतिकाराचे सर्व मार्ग हाताळू. ऑपरेशन लक्ष्मीरोडचे नाविन्य या ग्राहक चढाईत आहे, ग्राहकशक्तीच्या या लढाऊ आविष्कारात आहे. ग्राहक चळवळ येथे प्रथमच वयात आली असेही म्हणता येईल. दहा-वीस टक्क्यांनी कापडांचे भाव उतरले हे या चळवळीचे अगदी मामुली यश आहे. ग्राहकांचा आत्मविश्वास जागा झाला, त्यांना आपल्या सामर्थ्याचा प्रत्यय आला, हे यश अधिक मोलाचे, महत्त्वाचे. निघाल्यापासून अवघ्या दोन अडीच महिन्यात तिने यशाचा हा टप्पा गाठावा, ही विजयी झेप घ्यावी हे नि:संशय चळवळीच्या संघटकांना भूषणावह आहे.

 संघटक मुख्यतः युवक होते. एकीकडे या युवकवर्गाने ग्राहक चळवळीला जसे चढाईचे आक्रमक स्वरूप दिले तसेच दुसरीकडे तिच्या रचनात्मक स्वरूपाचेही भान ठेवले. नूतन मराठी विद्यालयाच्या प्रांगणात या युवकांनी चालवलेली

निर्माणपर्व । ९४