पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/188

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपून काम केलं तरच भरतील... त्यासाठी तरी तुला उठाया हवं, कामाला जाया हवं.'

 परवा पंधरवड्याचा पगार झाला होता. त्यामुळे कालच्या बाजारात ती मीठ-मिरची, तेल व इतर सामान आणायला नवऱ्याला घेऊन गेली होती. रोजगार हमीचं काम केल्यावर दररोज अर्धा किलो ज्वारीचं कुपन मिळायचं. ती कुपनं मोडून रेशन दुकानातून ज्वारी घ्यायची होती; पण दुकान बंद होतं. तिनं कानशिलावर दुकानदाराचा उद्धार करीत कडाकडा बोटं मोडली होती. पुन्हा पुढल्या आठवड्यावर हे काम गेलं. नाही तर रोजगार बुडवून बाजाराच्या गावी धान्यासाठी जायला आलं. पुन्हा कुपनाची मुदत संपायची भीती होती. आज इंजिनिअर साहेबांना हे सांगायला हवं. म्हणजे ते तहसीलदारांना सांगून काहीतरी व्यवस्था करतील.'

 त्यांच्या गँगमध्ये चांगल्या वीस-बावीस बाप्यांची गर्दी असूनही त्या गँगची तीच लीडर होती. सारे तिला ‘पाटलीण' म्हणत. कारण धीटपणे ती साऱ्यांशी बोलायची. हे संबोधन तिला सुखवायचं. त्याला कारणही तसंच होतं.

 गावचा जुना पोलिस पाटील दारूच्या पाई लोळागोळा होऊन मेला, तेव्हा प्रांत ऑफिसरनं तिच्या नवऱ्याला पोलिस पाटील केलं होतं.

 त्यांना स्वप्नातही असं घडेल असं वाटलं नव्हतं. कारण ते कैकाडी - भूमिहीन, मजुरीवर पोट भरणारे. सारजा व किसन दोघेही मिळेल तिथं मोलमजुरी करत. जेव्हा गावात व पंचक्रोशीत रोजगार हमीचं काम निघायचं, त्यावर ते जात. इतर वेळी शेतामध्ये किंवा दोन मैलांवर असलेल्या तालुक्याच्या गावी जाऊन किसन बसस्टॅडवर हमाली करायचा, तर ती गावीच सरपंच किंवा सावकाराच्या घरी वरची कामं करायची.

 पण नवीन प्रांतानं ही पोलिस पाटलाची जागा राखीव म्हणून भटक्या जमातीसाठी घोषित केली होती. किसन आठवी नापास होऊन शाळा सोडलेला. सहज गंमत म्हणून अर्ज केला आणि मुलाखत दिली. मग तो हे सारं विसरून गेला.

 जवळपास एका महिन्यानं त्याला नेमणुकीचं पत्र आलं आणि दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. त्या सबंध जिल्ह्यात कैकाड्याचा तो एकमेव पोलिस पाटील ठरला होता.

 आता मात्र त्याला मजुरीची, हमालीची कामं करायला नको वाटू लागलं होतं आणि प्रपंचाचा सारा भार तिच्यावर पडला. दोघांच्या श्रमानं कशीतरी तोंडमिळवणी

पाणी! पाणी!! / १८६