'खूप मजा आली. काय मस्त आहे शेवंताबाय! साली काय गच्च भरली आहे...' आणि बीभत्स हातवारे करीत तो सांगू लागला.
‘शी... शी...! इथे मी तुमची लग्नाची बायकू जिती हाय... तरी तुम्ही बाजार हुडकता?' तिचा संताप आवरत नव्हता.
'तुझ्यासंगं मजा नाही येत... हाडहाडं लागतात. छे! बाई कशी हवी!'
संताप व कमालीच्या उद्वेगानं गजरा भणाणून गेली होती. काल दिवसभर मनात जे ठसठसत होतं, ते एवढं खरं व्हावं याची तिला खंतही वाटत होती...
यावर्षी निसर्ग मेहरबान होता. पाऊसपाणी वक्तशीर व वेळेवर झाला. पुन्हा एकदा हणमंताच्या शेतात ऊस व गहू बहरून आले...
पाझर तलावाचं काम संपलं होतं. पाऊस ओसरताच गावातच पुन्हा जमीन सपाटीकरणाचे काम निघालं. ग्रामपंचायतीनं दवंडी दिली आणि गणरा पण कामावर जायला निघाली.
‘गजरे, आता कशाला जातेस कामावर? आवंदा शेतं झकास पिकली आहेत. आता काय कमी आहे आपल्याला?'
'जरा स्पष्ट बोलू का? राग नाही ना धरणार धनी ?' गजरा धीटपणे म्हणाली, ‘कमी आहे ती माझ्यामध्ये... मी सुकलेय, नुसती हाडंहाडं लागतात ना...!"
“होय गजरे, पूर्वी तू किती छान दिसायचीस... या रोजगार हमीच्या कामानं पार रया गेली बघ तुझी.'
'म्हणूनच तुमचं बाजारबसवीकडे जाणं सुरू झालं!' गजरा धीटपणे म्हणाली, ‘मला हौस नव्हती कामावर जाण्याची. पण पोटाला फासे पडल्यावर कुणीतरी कमावून आणलं पाहिजेच की!'
"बरं ते जाऊ दे. आता सारं ठीक झालंय ना?"
'नाही धनी, ठीक झालं असेल ते तुमच्यासाठी. या गजरेसाठी नाही.'
'तुला म्हणायचं तरी काय आहे?...'