'हे बघ राघू, - शेटजी दुकान बंद ठेवायला सांगून गेले आहेत, मला उघडता येणार नाही. पुन्हा तुझी कुपनं ही बोरसरची. त्या गावचा माल अजून आणला नाही. समजलंस? जा आता, माझा जीव खाऊ नको.'
'पन - शेटजी' न राहावून मैना मध्येच म्हणाली, 'म्या म्हंते - आसं दुकान न सांगता सवरता बंद ठिवता येतं? जंतेचे हाल हो केवढे? आमचंच बघा ना. जवळ लई कुपनं हायती - पण ती काई पोटास्नी घालता येत नाहीत - कसे भरावं खळगं? ल्हानी पोरं हायती- बीमार ननंद हाय - पोटाला नगो...?"
'ए भवाने मला जाब विचारतेस ?' संतापून आपल्या चिरक्या आवाजात मुनीमजी फणफणले, 'राघू तुझ्या बायकोला सांग - माझ्याशी नको बोलू म्हणून, मी बाईमाणसांशी नाही बोलत!
सोशिक राघू आपल्या कारभारणीवरच चिडला, 'ए गप बये, तुला काई समजता का? उगी आपली पिरपिर... गप्प... गप रहा पघू!' आणि लाचारीच्या स्वरात तो मुनीमजीकडे वळून म्हणाला.
'गलती जाली मुनीमजी - कारभारनीला काई अक्कल नाय -माफी असू दे... म्या नंतर येतो कुपन मोडायला...!
त्याला लाचारी पत्करून शांत राहणे भाग होते. कारण नेहमी रेशन दुकानात ज्वारी साखरेसाठी जावं लागत असे. त्यानं फटकन् देणं बंद केलं तर ?' हा प्रश्न होता, पुन्हा आज नाही, चार आठ दिवसांनी का होईना परत त्याच्या दारी जाणं भाग होते. कुपनावरचे गहू घेण्यासाठी, अनेकदा तर शर्माच ते गहू विकत घेत असे. अर्थातच पडत्या भावानं, राघूची वा इतर गावकऱ्यांची त्याबद्दल काही तक्रार नसे.
दम खात, अडखळत आपली शक्तिविहीन कुड़ी खेचत ठकुबाई आपल्या भावासंगे कशीबशी रांजणीला पोचली, तेव्हा ऊन उतरणीला लागलं होतं. आणि तिथलं नालाबंडिगचं काम संपायला आलं होतं. ठकुबाईनं मैनाच्या आधारानं तिथल्या एका झाडाखाली गलितगात्र होऊन बसकण मारली.
राघू तिथल्या मुकादमाकडे गेला. कामावरचा, कृषी सहायक केव्हाच तालुक्याला निघून गेला होता. राघूनं तहसीलदाराचं पत्र मुकादमाला दिलं, ते वाचून तो म्हणाला, "पण मंगळवारीच हप्ता सुरू झाला. हजेरीपटावर त्याच दिवशी नावं लिहिली जातात. आता पुढच्या मंगळवारी ये...!"
'नाय मुकादमदादा, म्या लई लांबून आलो हाय... आनी विसपुते सायेबांनी तुमास्नी त्यांचं नाव सांगाया सांगितलंय. तेंच्या पंचायतीमार्फत अर्ज दिलाय कामासाठी तवा --!