काही नेते नोटांनी भरलेल्या बॅगा घेऊन फिरले, तरी त्यांच्या एकाही उमेदवाराची अनामत रक्कम वाचण्याचीसुद्धा काही शक्यता नाही, हे पहिल्यापासूनच स्पष्ट होते. निकालात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच घडले नाही. सर्व भारतात मिळून पाचाच्या वर सहावा उमेदवार निवडून येणे कठीण होते हेही स्पष्ट होते; पण निकालात आणखी एक आनंददायक भाग म्हणजे चौधरी देवीलाल यांचा रोहटक मतदारसंघात पराभव झाला. विधानसभा मतदारसंघातही एका सामान्य उमेदवाराने त्यांना धूळ चारली. शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची घटना आहे. गेली चार वर्षे देवीलालपद्धतीच्या विचारसरणीने शेतकरी आंदोलनाच्या मार्गात मोठी धोंड उभी केली होती. जातीचे राजकारण करायचे. त्याच्या आधाराने सत्ता हाती घ्यायची, आव मात्र शेतकऱ्यांच्या कैवाराचा आणायचा. प्रत्यक्षात करायचे काहीच नाही. पंचतारांकित हॉटेलात शेकऱ्यांना २०० रुपयांचे जेवण १०० रुपयांत मिळण्याची सवलत देणे... असले आचरट कार्यक्रम राबवले. असली माणसे आणि प्रवृत्ती क्षणभर तरी टिकून राहतात, हेच आश्चर्य ! पण या प्रवृत्तीने गेली चार वर्षे शेतकरी आंदोलनात कठोर व्यत्यय आणला. या देवीलाल यांच्या उमाळ्यापोटीच महेंद्रसिंह टिकैत आणि इतर काही जणांनी वाढत्या ताकदीच्या शेतकरी चळवळीस मोडता घालायचा प्रयत्न केला. निवडणुकांच्या या निकालामुळे देवीलाल संपले. महेंद्रसिंह टिकैत आणि त्यांचे साथीदार खुलेआम भाजपला पाठिंबा देत आहेत. त्यांचा देव त्यांचे भले करो; पण शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीने देवीलाल यांचे पानिपत, ही खरोखरच आल्हाददायक घटना आहे.
महाराष्ट्रातील इंदिरा काँग्रेस आणि शरद पवार हे तर विशेष भाग्याचे. महाराष्ट्रात मे महिन्यात मतदान झालेच नाही; सगळे मतदान जूनमध्येच. या मधल्या काळात राजीव गांधी दूर झाल्यामुळे शरद पवारांचे पक्षातील स्थान पक्के झाले, एवढेच नव्हे तर हिमालयाच्या मदतीला सह्याद्रीने जाण्याची भाषा पुन्हा चालू झाली. भारताच्या राजकारणात फारा वर्षांनी महाराष्ट्राला काही स्थान मिळेल या कल्पनेने अनेकांना बरे वाटले. त्याचाही फायदा इंदिरा काँग्रेसला निश्चित मिळाला.
निकालाची चर्चा करताना मे आणि जून महिन्यात झालेल्या मतदानाला एकाच मापाने कसे तोलता येईल? १९३५ सालच्या आसपास एका वर्षी मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या बी.ए.च्या परीक्षेच्या एका विषयाच्या उत्तरपत्रिका आगीत जळून खाक झाल्या; त्याचा गवगवा नको म्हणून विद्यापीठाने सर्वच परीक्षार्थीना उत्तीर्ण करायचे ठरवले; पण ही बातमी बाहेर फुटलीच आणि त्या वर्षी बी.ए. पास झालेल्या विद्यार्थ्यांना कुचेष्टेने जळके बी.ए. म्हणतात. जून महिन्यातील