सुरू केली.
या निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यांतील या संस्थानिकांच्या संस्थानांमधून जाताना मला एक प्रश्न पडतो, की ९५ सालच्या निवडणुका आणि ९० सालच्या निवडणुका यांतील भाषणांमध्ये काहीतरी फरक असायला हवा की नको? ९० सालच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर ९१ मध्ये जगामध्ये समाजवादाचा पराभव झाला. हिंदुस्थानामध्ये काँग्रेसचे पंतप्रधान राव यांनी स्वतः कबूल केलं, की नेहरूवादानं देशाचं नुकसान झालं. आता आम्ही खुली व्यवस्था स्वीकारणार आहोत आणि गेल्या वर्षी, १९९४ मध्ये सरकार नावाचा खिसेकापू आपल्या हाती 'रंगेहाथ' सापडला. त्यांनी स्वतः कबूल केलं, की आम्ही शेतकऱ्यांना लुटतो. दरवर्षी चोवीस हजार कोटी रुपयांना लुटतो. या दोन घटना घडल्यानंतर निवडणुकांच्या भाषणांत काही फरक पडावा की नाही ?
१९९१ मध्ये देशाची हालत इतकी वाईट झाली, की देशातलं सोनंसुद्धा बाहेर नेऊन गहाण ठेवावं लागलं; मग आता १९८० मध्ये मी जो प्रश्न शेतकऱ्यांना विचारला, तो प्रश्न पुन्हा कोणी तरी सर्वच भारतीयांना विचारला पाहिजे की नाही ? आता स्वातंत्र्य मिळून सत्तेचाळीस वर्षे झाली आणि अजून स्वातंत्र्यानंतर देशाची प्रगती व्हायची लक्षणं दिसत नाहीत. उलट अधोगती होते आहे. १९४७ मध्ये आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जगात चाळीस देश होते आणि त्यांत आपल्या देशाचा क्रमांक वरून तेरावा होता. आज जगात एकशे ऐंशी देश आहेत आणि त्यांत आपल्या क्रमांक खालून पाचवा म्हणून वरून एकशे शहात्तरावा आहे.
असं का झालं ? स्वातंत्र्यानंतर देशामध्ये जे स्वप्न उभं राहील असं गांधींनी सांगितलं होतं, ते खोटं का ठरलं? या प्रश्नाचं उत्तर द्यायला, या निवडणुकीच्या भाषणात कुणी तयार नाही.
शेतकरी संघटनेने एक नवीन धोरण १९८० सालापासून चालवलं. आम्हाला राजकारण नको, सरकारात जायचं नाही, सत्तेत जायचं नाही आम्हाला फक्त आमच्या घामाचा दाम पाहिजे, शेतीमालाचा भाव पाहिजे; ते मिळविण्यात आडकाठी आणू नका म्हणजे झालं. आमची मागणी कशी होती?
एका आंधळ्या भिकाऱ्याची गोष्ट सांगतो. एकदा त्या भिकाऱ्याला देव प्रसन्न झाला आणि म्हणाला, 'एकच वर माग.' भिकारी म्हणाला, की