हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंजत पडली व देश आज एका नव्या आर्थिक गुलामगिरीच्या पाशात अडकत चाललेला आहे. इंग्रजांना आपण घालविले पण मागील दाराने, रशिया, अमेरिका घरात घुसले आहेत, इकडे आपले पूर्ण दुर्लक्ष होत आहे. या बड्या परकीय शक्ती आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला असलेला सर्वात मोठा धोका आहे व या शक्तींविरुद्ध जनमत संघटित करणे, बड्या शक्तींची मदत घ्यावी न लागता स्वावलंबनाची कास धरून येथे पर्यायी नियोजनपद्धती यशस्वी करणे, हे राष्ट्रीय एकात्मतावाद्यांसमोरील सर्वात महत्त्वाचे कार्य असायला हवे. आपली श्रमशक्ती आणि निसर्गशक्ती यांची सांगड घालून आपण स्वावलंबी भारत निर्माण करणार नसू, तर आर्थिक व त्याबरोबरच येणारी सांस्कृतिक गुलामगिरी अटळ आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या कर्जाने व त्यावरील अटींनी ही गुलामगिरी स्पष्टही झालेली आहे. म्हणून पुन्हा स्वदेशी व स्वावलंबनाच्या टिळक-गांधी मंत्राचा उच्चार व आचार आता, कालमानाप्रमाणे त्यात आवश्यक ते बदल करून, सुरू व्हायला हवा. असा लोकपुरुषार्थ ही खरी आजची निकड आहे. अशा पुरुषार्थाशिवाय नुसती एकात्मता टिकली काय, गेली काय, सारखेच ! सगळा एकात्म भारत हा रशियाचा किंवा अमेरिकेचा मनाने व शरीराने गुलाम झालेला आपल्याला चालणार आहे का ? पुरुषार्थ विचाराशिवाय, आचारणाशिवाय केवळ राष्ट्रीय एकात्मतेची चर्चा ही केवळ एक पुस्तकी, अनुत्पादक व वांझोटी चर्चाच ठरण्याचा संभव अधिक. म्हणून जे कोणी हा देश आपला मानून त्यासाठी त्याग करण्यास पुढे येतील, त्या सर्वांना बरोबर घेऊन, जे कोणी येणार नाहीत त्यांना आमंत्रणांवर आमंत्रणे धाडण्यात वेळ खर्ची न घालता, आणि जे कोणी विरोध करतील त्यांचा विरोध मोडून काढून, स्वावलंबी व समर्थ भारताच्या उभारणीचे नवे महानिर्माण पर्व येथे सुरू व्हायला हवे. अशा नव्या पुरुषार्थवादाची पेरणी हीच आपल्या राष्ट्रीय एकात्मतेची गुरुकिल्ली आहे. असा पुरुषार्थ चीनमध्ये माओने निर्माण केला म्हणून चीन आज आपल्यापेक्षा मूलभूत क्षेत्रात व शस्त्रास्त्रस्पर्धेतही पुढे गेलेला आहे. माओ साम्यवादी होता म्हणून हे घडले नाही. अनेक पूर्व युरोपीय देशही रूढार्थाने साम्यवादी होते व आहेतही. या सगळ्यांना रशियाच्या गुलामगिरीत अडकावे लागले. चीनचा राष्ट्रपुरुषार्थ माओने जागा केला म्हणून चीन पुढे गेला. चीनमध्ये हुकुमशाही आहे, आपण लोकशाहीचा प्रयोग करीत आहोत, हेही चीन व भारत तफावतीमागचे कारण नाही. अनेक डाव्या आणि उजव्या हुकुमशाही राजवटी एकात्म असल्या तरी परावलंबी असतात. क्युबाला कुठे चीन होता आले ? तेव्हा हुकुमशाही, साम्यवाद वगैरे कारणे दाखवून चीनचे यश आपल्याला कमी करता येणार नाही. चीनमध्ये क्रांती झाल्यावर माओने स्वावलंबी चीनच्या उभारणीचा ध्येयवाद डोळ्यांसमोर ठेवला, नियोजनाची वेगळी व स्वायत्त पद्धती स्वीकारली, रशिया किंवा

।। बलसागर ।। १०७