पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/102

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनात काही प्रश्नचिन्हे आणि भीती तयार करतात.
 धर्मवादाचे भूत
 निसर्गशेतीच्या निमित्ताने एक नवा धर्मवाद शेतीमध्ये घुसविण्याचा प्रयत्न होतो आहे असा संशय घेण्यास जागा आहे. बाबामहाराजांचे अनेक शिष्यवर आणि स्वत:ला गांधीवादी म्हणवणारे आणि जन्माच्या अपघाताने मिळालेल्या त्या धर्माच्या वारशाचा गर्व मिरविणारे अनेक लोक निसर्गशेतीच्या चळवळीत अग्रभागी आहेत. शेतकऱ्यांनी निसर्गशेती चळवळीतील धर्मवाद्यांपासून आणि समाजवाद्यांपासून सावध राहिले पाहिजे. मी हा मुद्दा आवर्जून मांडतो, कारण मला हा धोका फार भयानक वाटतो. निसर्गशेतीचे प्रयोग करणाऱ्यांपैकी अनेकजण धर्मवादी तत्त्वज्ञानाने प्रेरित झालेले आहेत. खुद्द 'मासानोबु फुकुओका' यांची निसर्गशेतीची मांडणीच धर्मावर भर देते. त्यांनी म्हटले आहे,
 "नैसर्गिक शेतीमध्ये धर्म, तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांचा संयोग झाला आहे हे विशेषत: भारतीयांनी जाणले आहे. नैसर्गिक शेती हेच परम सत्य, खरा साधनमार्ग व यथार्थ शेतीपद्धती होय ही गोष्ट त्यांना आकळली याने मला धन्यता वाटली."

 पुण्याच्या आसपास वावरांवर गायत्री मंत्राचा प्रयोग सांगणारे 'विज्ञानंद' झाले. तसेच 'निसर्गशेतीतील धर्मवादी' शेतकऱ्यांना धोका देऊ पाहत आहेत. रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांनी शेतकरी पोळलेला आहे याचा फायदा घेऊन 'विज्ञान हरले, अध्यात्म जिंकले' अशा आरोळ्या ठोकायला त्यांनी सुरुवात केली आहे. निसर्गशेतीची गोडी शेतकऱ्यांना लागली की मग जुन्या काळच्या ख्रिश्चन मिशनऱ्याप्रमाणे अध्यात्मात बाटवण्याचे हे कारस्थान आहे. जनावरांचे मूत्र शेतीला फायदेशीर पण त्यात गोमूत्र सर्वात फायदेशीर असा प्रचार गोपूजक धर्मवादी करतात. अर्धवट शास्त्रीय परिभाषेत त्याचे थातूरमातूर समर्थन देऊन लोकांना भुलवतात. ज्या ज्या देशात एक वशिंडाची गाय आहे तो तो देश आणि तेथील पर्यावरण उद्ध्वस्त झाले आहे. तरी त्या गाईचे देव्हारे माजवतात; ज्योतिष शास्त्राच्या आधाराने वैदिक शेती करण्याची शिफारस करतात. रायानिक शेतीचा पराभव झाला असेल, नसेल पण विज्ञानाचा पराभव झालेला नाही, चुकीच्या तंत्रज्ञानाचा पराभव झाला आहे. विज्ञाननिष्ठा जिंकत आहे. नफ्याची प्रेरणा सर्वात सबळ आणि सुष्ट प्रेरणा सिद्ध झाली आहे. ही दोन मूल्ये रासायनिक शेतीबरोबर सोडली तर घंगाळातील गढूळ पाण्याबरोबर त्यात न्हाऊ घातलेले बाळही फेकून दिल्यासारखे होईल.

बळिचे राज्य येणार आहे / १०४