पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/213

हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाळे आवश्यक आहे.
 ५. सध्याची धान्य आणि इतर शेतीमाल यांच्या खरेदीची व्यवस्था बदलून त्याऐवजी गोदामात माल ठेवून त्याच्या आधाराने किमतीच्या ७० टक्क्यापर्यंत उचल शेतकऱ्याला मिळण्याची व्यवस्था महत्त्वाची ठरेल. त्यासाठी, गोदामाच्या पावत्या (warehouse receipts) यांची निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टखाली गणना केल्यानेही काम सुलभ होईल.
 ६. ही सर्व कामे शासनव्यवस्थेला पेलण्यासारखी नाहीत. सहकारी संस्थांच्याही ती आवाक्याबाहेरची आहेत. यासाठी, कंपनीव्यवस्थेतील कार्यक्षमता आणि सहकारातील सहभागाची प्रेरणा एकत्र आणून एका नवीन आर्थिक संघटनेची बांधणी करावी लागेल. शेतकऱ्यांनी एकत्र यावे, जमिनीच्या प्रमाणात समभाग घेऊन शेतकऱ्यांची कंपनी तयार करावी आणि कंपनीने भांडवल, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान व शिवाराबाहेरील साठवणूक, प्रक्रिया, विक्री, निर्यात इत्यादी सर्व, सुगीनंतरची कामे यांची जबाबदारी घ्यावी. हे शक्य झाल्यास अगदी नजीकच्या भविष्यकाळात भारतीय शेतकरी जागतिक स्पर्धेचे आव्हान पेलून सशक्तपणे सर्व जगापुढे उभा ठाकू शकेल.
 हजारो वर्षांच्या गुलामगिरी आणि शोषणानंतर जागतिक परिस्थितीत झालेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांच्या हातापायांतील बेड्या तुटून पडत आहेत. या गुलामगिरीतच सुख आहे आणि स्वतंत्रता सारी भयानक कष्टप्रद आहे असे संधिसाधूंनी कितीही भासविले तरी त्याला बळी न पडता सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करून एक नवी जागतिक दर्जाची शेतीव्यवस्था उभी करून शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा निर्धार या मेळाव्यातील आम्ही शेतकरी जगापुढे निश्चयपूर्वक जाहीर करीत आहोत.

(शेतकरी संघटक, २१ मार्च २००१)

बळिचे राज्य येणार आहे / २१५