पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/374

हे पान प्रमाणित केलेले आहे.
शेतकऱ्यांची संघटना
अडचणी आणि मार्ग


 साध्य ते साध्य :
 'शेतकऱ्यांची संघटना झाल्याशिवाय काही काही व्हायचे नाही.'
 'शेतकऱ्यांची एकजूट व्हायला पाहिजे.'
 'कलियुगात संघटित झाल्याखेरीज शक्ती नाही.'
 शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा चालू असली की सगळ्यांचे एकत असते, शेतकऱ्यांची मजबूत आघाडी झाली पाहिजे तरच त्याच्या दुःखांना वाचा फुटू शकेल, एरवी त्याला सगळे रगडणार, पिळणार.
 पण त्याच्याबरोबरच निराशेचे सूरही लगेच निघतात.
 'पण आपली कुठंची एकी व्हायला हो!'
 'शेतकऱ्यांची संघटना म्हणजे वाळूचा पूल, कधीच बनायचा नाही.'
 'आहे पण ही आवळ्याची मोट बांधायची कुणी? पुष्कळांनी प्रयत्न केले पण नाही जमलं, शेतकरी अडाणी!'
 म्हणजे शेतकरी संघटना आवश्यक आहे याबद्दल जितके एकमत तितकेच अशी संघटना होणे कठीणच नव्हे तर जवळ जवळ अशक्य आहे यावरही सगळ्यांचे एकमत दिसते.
 इतिहासामध्ये जे आवश्यक असते ते अशक्य कधीच नसते.
 शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्याआधी महाराष्ट्रात जी भयानक स्थिती होती ती पाहता कुणाला आशा वाटली असती की हा मृतप्राय समाज पुन्हा खडबडून जागा होईल? पण अशक्य ते घडले आणि जुलमी राज्यकर्त्यांच्या बलाढ्य सत्तेचा मुकाबला केला मूठभर मावळ्यांनी.

 तुकाराम महाराज म्हणतात-

बळिचे राज्य येणार आहे / ३७६