पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/162

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८



हें केवळ आपल्यासारख्यास फार लज्जास्पद आहे!" बायजाबाईसाहेबांच्या ह्या स्पष्ट लिहिण्यानें गव्हरनरजनरलसाहेबांच्या मनावर कांहींएक परिणाम झाला नाहीं. त्यांनी त्यांस एवढेच उत्तर पाठविलें कीं, "मनुष्याच्या आयुष्यांत अशा प्रकारची स्थित्यंतरें हीं असावयाचींच. त्यावांचून कोणी सुटलें नाहीं. ह्याकरितां ईश्वरेच्छा समजून, शांतपणाने, नशीबीं काय असेल ते सोसिले पाहिजे !"

 ह्या सर्व गोष्टी बंडाच्या पूर्वीं कित्येक वर्षें घडलेल्या होत्या. तथापि बायजाबाईसाहेब ह्या कोणी सामान्य मनुष्य असत्या, तर त्यांच्या मनांत त्या वज्रलेपाप्रमाणें घट्ट बसून त्यांनी स्नेहभावाचा तेथें कधींही प्रवेश होऊ दिला नसता. किंबहुना, बंडासारखी चांगली संधि प्राप्त होतांच, त्यांनी दुखविलेल्या वाघिणीप्रमाणें चवताळून जाऊन त्यांचा सूड घेतला असता. परंतु अशा अप्रिय व अनिष्ट गोष्टी देखील सर्व विसरून जाऊन, बायजाबाईसाहेबांनीं ह्या बिकट प्रसंगी सार्वभौम प्रभूस उत्कृष्ट साहाय्य केलें, आणि सुवर्णाच्या कोंदणांत तेजस्वी रत्नाप्रमाणें चमकणारें आपल्या सुशील हृदयांतील प्रशंसनीय औदार्य सर्व जगास विश्रुत केले. ह्याबद्दल ह्या राजस्त्रीचें जेवढें अभिनंदन करावे तेवढें थोडेंच आहे.


 1. "The Bai, in her correspondence with the Governor-General, always-unhesitatingly asserted that he had confirmed her in the Regency, and authorised her to continue in the management of the State. "It is very extraordinary" she remarks, "that while your Lordship is my protector, such injuries have been inflicted on me, a circumstance which cannot but be considered a cause of shame to yourself." The only answer she received was the remark that no station in life was exempt from vicissitudes, and an exhortation to bear her with resignation.”–Mill's History of India.