पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/42

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९

 भानजी घाटगे ह्यांचे संबंधाची विश्वसनीय माहिती उपलब्ध नाहीं. भानजीचे वंशज पिराजीराव घाटगे ह्यांच्यापासून ह्या घराण्याची संगतवार वंशावळी मिळते. पिराजीराव ह्यांस विजापुरचा बादशाह दुसरा इब्राहिम आदिलशाह (इ. स. १५८०-१६२६) ह्याच्या सुलतान महमद नामक वजिराकडून कागल परगणा व त्यांतील ६७॥ गांव इनाम मिळाल्याचा उल्लेख सांपडतो. त्यावरून पिराजीराव हे विजापुरच्या बादशाहीमध्ये प्रख्यात पुरुष होते असें मानण्यास हरकत नाही. त्यांच्या पश्चात् आबाजीराव, विठोजीराव, महादाजीराव, विठोजीराव आणि दुसरे पिराजीराव ह्या पुरुषांनीं कागल जहागिरीचा उपभोग घेतला. दुसरे पिराजीराव ह्यांस राणोजीराव, विठोजीराव, आबाजीराव, तुळजाजीराव व यशवंतराव असे पांच पुत्र होते. त्यांपैकी तुळजाजीराव ह्यांस जयसिंगराव व रामचंद्रराव असे दोन मुलगे होते. त्यांपैकीं जयसिंगराव ह्यांचे पुत्र सखारामराव हे पेशवाईच्या अखेरीस उदयास आले. मराठी राज्यामध्यें कागलकर घाटग्यांनी काय काय पराक्रम गाजविले, ह्याबद्दलची माहिती अद्यापि उपलब्ध झाली नाहीं. तथापि हें जुने व थोर घराणें कोल्हापूर प्रांतीं बरेंच प्रसिद्ध असावें असें दिसतें. इ. स. १७९२ सालीं ह्या घराण्यांतील यशवंतराव नामक एका पुरुषास कोल्हापुरचे छत्रपति शिवाजी महाराज ह्यांची कन्या आऊबाईसाहेब ही दिली होती. त्या वेळी ह्या घराण्याकडे कागलची जहागीर चालत नसून, ती कोल्हापुरच्या छत्रपतींच्या ताब्यात होती; व त्यांनी फक्त सहा गांव यशवंतराव ह्यांस लग्नाप्रीत्यर्थ इनाम दिले होते. तथापि तेवढ्या उत्पन्नावर घाटग्यांच्या घराण्याचा चांगला परामर्ष होईनासा झाला. त्यामुळे यशवंतराव व त्यांचे चुलत बंधु सखारामराव ह्यांच्यामध्ये तंटा उत्पन्न झाला. त्या वेळीं सखारामराव हे ईर्षेस पेटून, कागलाहून निघून परशुरामभाऊ पटवर्धन ह्यांचे पदरीं नौकरीस जाऊन राहिले.