पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/46

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३

पुरुष निराश झाले, व जिकडे अवकाश मिळेल तिकडे आपली शिपाईगिरी दाखविण्याकरितां निघून गेले. त्यामुळें मराठ्यांचे ऐक्य व तेजस्विता लोपली जाऊन महाराष्ट्रमंडळाचा नाश झाला. अशा पुरुषांपैकीं बाजीराव पाटणकर हे एक होत. पुणेदरबारांत ह्यांच्या शौर्यगुणांचें योग्य अभिनंदन व चीज न झाल्यामुळें हे मुधोजी भोंसले नागपूरकर ह्यांच्याकडे गेले. तेथें त्यांनी अनेक पराक्रमाची कृत्यें केलीं, व भोसल्यांच्या दरबारांत फार लौकिक मिळविला. पुढें बाजीराव पेशवे ह्यांनी त्यांस पाचारण करून पुण्यास आणविलें; आणि त्यांस आपल्या दरबारांत ठेवून घेतले. बाजीरावसाहेबांनी त्यांचे शौर्य पाहून त्यांस मौजे तांबवे हा गांव इनाम दिला. तो त्यांजकडे व त्यांचे बंधु जयरामराव ह्यांजकडे इ. स. १८१८ पर्यंत चालत होता. पुढे इ. स. १८१८ सालीं महाराष्ट्रामध्यें राज्यक्रांति घडून आली; व पेशव्यांची सत्ता नष्ट होऊन, इंग्रजसरकार महाराष्ट्राचे सार्वभौमप्रभु बनलें. त्या वेळी मि. एल्फिस्टन ह्यांनीं, बाजीराव पाटणकर ह्यांची योग्यता व खानदान हीं लक्ष्यांत घेऊन, त्यांस तीन हजार रुपये सालीना पेनशन करून दिलें. परंतु बाजीराव पाटणकर लवकरच मृत्यु पावले. नंतर त्यांच्या स्त्रीस १२०० रुपये तैनात झाली. ती सातारचे छत्रपति प्रतापसिंह ऊर्फ थोरले महाराज ह्यांच्या कारकीर्दीपर्यंत चालत होती.
 बाजीराव पाटणकर ह्यांस सुंदराबाई ऊर्फ नानीसाहेब नामक एक कन्या होती. ती कागलचे जहागीरदार सखारामराव घाटगे सर्जेराव ह्यांस दिली होती. ही बाई फार साध्वी व सुशील असे. हिच्या पोटीं सर्जेराव ह्यांस जयसिंगराव व बायजाबाई अशी दोन अपत्यें झाली. जयसिंगराव ह्यांचा जन्म इ. स. १७७९ ह्या साली झाला; व बायजा-


 १. मेजर जी. मालकम कोल्हापुरचे अक्टिग पोलिटिकल सुपरिंटेंडंट ह्यांनी ता. ३ जुलै इ. स. १८५४ सालीं सरकारास कोल्हापूर प्रांतांतील जहागिरीबद्दल जो रिपोर्ट केला आहे, त्यांत जयसिंगराव बाबासाहेब ह्यांचे वय ७५ वर्षांचे दिले आहे. त्यावरून हा सन सिद्ध होतो.