पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
११९
 


द्रौपदीचा संताप

 युधिष्ठिराने समेटाचा आग्रह धरला आहे व श्रीकृष्ण त्याप्रमाणे कौरवांशी समेट करण्यास जात आहे हे ऐकून द्रौपदी अत्यंत संतापून गेली. सूडाच्या भावनेने ती तेरा वर्षे सारखी जळत होती. वैरवन्ही तिच्या चित्तात अहोरात्र प्रज्वाळलेला होता. आणि त्याचा उपशम न करता आपले पती पुन्हा याचकासारखी समेटाची इच्छा करू लागले ही कल्पना तिला असह्य झाली आणि अशा स्थितीत श्रीकृष्ण दिसताच ती विजेसारखी कडकडकड करू लागली. ती म्हणाली, 'कृष्णा, माझा अवमान करून क्षणभर तरी दुर्योधन जिवंत राहातो त्याअर्थी अर्जुनाच्या धनुर्विद्येला धिक्कार असो आणि त्या भीमाच्या सामर्थ्याचाही धिक्कार असो. कृष्णा, तू संधी करू पाहत आहेस; पण दुःशासनाने आसडा मारलेला माझा हा केशपाश तुझ्या लक्षात असू दे. हे भीमार्जुन आज याचकासारखे संधी करू पाहत आहेत ! तरी चिंता नाही. माझे वृद्ध पिताजी व माझा महारथी बंधू हे माझ्यासाठी लढतील. शिवाय माझे महाबलशाली असे पाच पुत्र आहेत. अभिमन्यूला नायक करून ते माझ्यासाठी लढतील. सख्या कृष्णा, माझ्या वेणीला ज्याने आसडा मारला तो दुःशासनाचा हात छिन्नभिन्न होऊन रक्ताने व धुळीने भरलेला असा जोपर्यंत माझ्या दृष्टीला पडला नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही. पेटलेल्या अग्नीप्रमाणे हा संताप पोटात ठेवून प्रसंगाची वाट पाहात असता आज तेरा वर्षे लोटली आणि आज माझ्या प्रिय भीमराजालाहि धर्म आठवला आहे.'
 असे बोलून ती विशालनयना, द्रौपदी अश्रूंनी कंठ दाटून येऊन सकंप व गद्गद स्वराने रडू लागली. तेंव्हा द्रवीभूत अग्नी