पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
११
 

आड केले नसते तर त्यांचा अधःपात झालाच नसता. आणि आजही त्यातले प्रत्येक तत्त्व अनुकरणीय म्हणून मी सांगणार नसलो तरी त्यातील मूळ गाभा हा जशाच्या तसा समाजापुढे समाजधारणेचे शास्त्र म्हणून ठेवण्यास काहीच प्रत्यवाय नाही.
 धर्मशास्त्र, समाजकारण, व्यवहारनीती व प्रवृत्तिधर्म या विषयांसंबंधी जे विचार 'भारतीय तत्त्वज्ञान' म्हणून पुढे दिले आहेत त्याशिवाय अन्य विचार महाभारतात नाहीत असे नाही. पुष्कळ ठिकाणी येथे सांगितलेल्या विचारांच्या उलट असेही विचार महाभारतात सापडतात. असे असताना हेच तत्त्वज्ञान म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान असा आग्रह का धरावा असा प्रश्न येईल. त्याचे समाधान असे की, एक तर मी जे तत्त्वज्ञान सांगणार आहे ते सर्व प्रपंचाविषयीचे विज्ञान आहे आणि ऐहिक वैभवाचा परमोत्कर्ष साधला तरच निःश्रेयसप्राप्ती होते असा महाभारताचा प्रमुख सिद्धांत आहे. तेव्हा या विचाराविरुद्ध असे विचार भारतात कोठे आले तर ते त्या त्या व्यक्तीचे म्हणून ठरतील. त्यांना भारतीय विचार म्हणता येणार नाही. दुसरे असे की, प्रपंचाचा अभिमान धरून, म्हणजे मुख्य सिद्धांत मान्य करून ज्यांनी ज्यांनी तत्त्वज्ञान सांगितले आहे त्यांच्या भाषणांत पुढे दिलेल्या विचारांना विरोधी अशी वचने फार थोडी सापडतील. अगदी एकांतिक मोक्षवादी माणसांची गोष्ट निराळी. ही दोन कारणे झाली. पुढील तत्त्वज्ञान हेच भारतीय तत्त्वज्ञान असे म्हणण्याचे तिसरे व प्रधान कारण हे की श्रीकृष्णाचे जे तत्त्वज्ञान ते हेच आहे. महाभारतात अनेक मतांचे प्रतिपादन जरी असले तरी त्या वेदाचा आद्य प्रणेता जो श्रीकृष्ण त्याची राजमुद्रा ज्या मतावर असेल तेच तत्त्वज्ञान 'भारतीय' या पदवीस योग्य होय, असे म्हटल्यास त्यावर कोणी