पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

ऐकूनच मी तुला हा उपदेश करीत आहे असे नाही. हे जे मधुतुल्य ज्ञान साठविलेले आहे ती ज्ञानसंपन्न अशा लोकांच्या ज्ञानाचीच पराकाष्ठा आहे. अर्थात ज्ञानसंपन्न लोकांनी संकटप्रसंगी असे आचरण न करणे फार भयावह आहे असे दिसून आल्यामुळेच ते आचरण करावयाचे ठरविले आहे. राजाने अनेक प्रकारच्या लोकांकडून अनेक प्रकारचे ज्ञान संपादन केले पाहिजे. युधिष्ठिरा, राजाने आपल्या बुद्धीच्या योगाने धर्माचे त्या त्या बाजूने संशोधन केले पाहिजे. धर्माचा प्रकार एकच असला तर तो राजाचे हातून घडू शकणारच नाही. यास्तव बुद्धीने त्याचे अनेक प्रकार जाणले पाहिजेत. राजा, काही लोक खरे ज्ञानी असतात व काहींचे ज्ञान खरे नसते. यास्तव त्याची आधी बरोबर रीतीने माहिती मिळवून जे ज्ञान सज्जनांना मान्य असेल त्याचाच सुज्ञ लोक अंगीकार करीत असतात. पण राजा, सज्जनांनी देखील दांभिकपणे आचरण केलेला जो धर्म असेल त्याचा तुला स्पर्श होता कामा नये. केवळ शास्त्राच्या अनुरोधाने किंवा केवळ बुद्धीने धर्मनिर्णय करणे शक्य नाही, (न धर्मवचनं वाचा नैव बुध्येति नः श्रुतम् ॥ शांति. १४२, १७) कारण त्याला या दोहोंचीही अपेक्षा असते असे बृहस्पतीचे मत प्रत्यक्ष इंद्राने सांगितले आहे. राजा, लोकांचा योग्य रीतीने चरितार्थ चालविणे हा धर्म आहे असे काही पंडितांचे मत आहे. म्हणून ज्ञानसंपन्न राजाने सज्जनांना मान्य असलेला धर्म कोणता याचा आपल्या बुद्धीनेच विचार करावा. राजा ज्ञानास कारणभूत असल्यामुळे काही लोक (श्रुतीतील) वचनाचीच प्रशंसा करितात. पण ते केवळ अज्ञान होय. दुसरे युक्तीपुढे शास्त्र टिकत नाही म्हणून शास्त्रच निरर्थक होय असे म्हणतात, पण तेही अज्ञानच होय.' (शांति. १४२)