पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

ठरविताना जन्मसिद्ध चातुर्वर्ण्याचाच विचार गृहीत धरलेला आहे असे दिसते. ते कसे ते प्रथम पाहू.
 कौरवपांडवांच्या युद्धांत गांधारीचे सर्व पुत्र मारले गेले. शेवटी दुर्योधन मारला गेला हे कळताच ती अतिशय शोक करू लागली. त्या वेळी तिचे सांत्वन करताना श्रीकृष्ण म्हणाले, "तू क्षत्रिया आहेस व क्षत्रियांना रणांगणात मृत्यू हाच भाग्यदायक होय. तसा मृत्यू तुझ्या पुत्रांना प्राप्त झालेला आहे. तेव्हा तू शोक करू नकोस." या वेळी श्रीकृष्णांनी पुढील उद्गार काढले.

तपोर्थीयं ब्राह्मणी धत्त गर्भं, गौर्वोढारं, धावितारं तुरंगी ।
शूद्रा दासं पशुपालं च वैश्या, वधार्थीयं क्षत्रिया राजपुत्री ॥

-( स्त्री. २६, ५)

 ब्राह्मणस्त्री गर्भ धारण करते तो त्याने जन्माला येऊन तप करावे म्हणून. गाईने ओझी वाहणारा व घोडीने धावणारा असा गर्भ धारण केलेला असतो. त्याचप्रमाणे वैश्यस्त्री ही गोरक्षण करणारा व शूद्रस्त्री दासकर्म करणारा गर्भ धारण करते आणि क्षत्रिय राजकन्या युद्धात शत्रूला मारणारा किंवा मरणारा गर्भ धारण करिते.
 श्रीकृष्णांनी येथे दिलेले मत अगदी स्पष्ट आहे. गुण हे आनुवंशावर अवलंबून असतात असा त्यांचा सिद्धांत आहे. गाय किंवा घोडी हिला विशिष्टगुणान्वितच पुत्र होतो. त्याप्रमाणे ब्राह्मणी, क्षत्रिया, वैश्या व शूद्रा यांनाही विशिष्टगुणान्वितच पुत्र होतात. त्या त्या पुत्रांचे हे गुण व त्यांचे पुढील कर्म हे गर्भामध्येच ठरलेले असते. म्हणजे ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व हे गर्भापासून, म्हणजे जन्मावरूनच ठरलेले असते आणि त्या त्या पुत्रांनी काय कर्म करावयाचे हेही जन्मावरून ठरलेले आहे.